इंडिया दर्पण विशेष – नमामी गोदा
वॉटर बँकेचा गोदावरीशी काय संबंध
गोदावरी ही स्वच्छ आणि सतत प्रवाही रहावी यासाठी वॉटर बँक हे अभियान हाती घेणे गरजेचे आहे. हे अभियान काय आहे, त्यामुळे नक्कीच गोदावरीची आजची स्थिती बदलेल का….
आपण जर बघितले तर आता नदीचे वाहणे, प्रवाहित राहणे हे धरणांच्या दरवाज्यांवर अवलंबून आहे. आणि आता तर सिमेंटच्या कॉक्रिटीकारणामुळे सर्व शहरांच्या रस्त्यांवरूनच नद्या वाहतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे आपण पावसाच्या पाण्याला जमिनीत जावूच देत नाही. एकतर ते पाणी पावसाळी गटारी मधून शहराच्या बाहेर काढून दिले जाते किंवा ते रस्त्यांवरून वाहते. त्यामुळे थोडासा जरी पाऊस पडला तरी शहरांमध्ये पूर येतो. मोठ्या प्रमाणावर जीवितहानी, वित्तहानी होते. यासाठी आधी नदीची परिभाषा समजून घेणे गरजेचे आहे.
हिमजल, भूजल-स्त्रोत्र एवं वर्षा के जल को उद्गम से संगम तक स्वयं प्रवाहित रखती हुवी, जो अविरलता, निर्मलता और स्वतंत्रता के साथ बहती है ..और सदियोंसे सूरज वायू और धरती से आजादी से स्पर्श करती हुवी जीव सृष्टी से परस्परपूरक और पोषक नाता जोडकर जो प्रवाहित है …वो नदी है …..- प्रा. जी डी अगरवाल, डॉ राजेंद्र सिंग.
या अनुषंगाने एक नवी उपक्रम माय वॉटर बँक (MY WATER BANK) हाती घेतला आहे. तसा जमिनीत पाणी मुरवणे हा उपक्रम काही नवी नाही. तसा कायदाही आहे. परंतु आता या कायद्याची अंमलबजावणी लोकचळवळीतून करावी लागेल. नाहीतर वेळ निघून गेलेली असेल. नद्यांना बारमाही प्रवाहित करायचे असेल तर दिवसंदिवस घटत चाललेली भूजल पातळी वाढवावीच लागेल. हे काम अनेक वर्षे ग्रामीण भागात चाललेले आहेच. परंतु गरज आहे ती शहरी भागातही करण्याची.
आपण ज्याप्रमाणे बँकेत पैसे ठेवतो आणि गरजेनुसार काढतो. किंवा आपल्या मुला-बाळांसाठी ठेवी ठेवतो, त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घराच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी फिल्टर करून आपल्या बोअरवेल मध्ये, विहिरीमध्ये अथवा शोषखड्ड्यात जपून ठेवणे आणि गरजेनुसार वापरणे ही संकल्पना म्हणजे MY WATER BANK..
निसर्गाला २००/३०० फूट पाणी बोरवेल मध्ये जमिनीत पोहचवायला शेकडो वर्षे लागतात. आणि आपण ते पाणी काही मिनिटांतच काढून घेतो. परंतु आपण जर त्या बोअरवेल/विहिरी मध्ये म्हणजेच आपल्याच पाण्याच्या बँकेतून पाणीरुपी पैसे फक्त काढतच राहिलो. त्यात परत भरणा केलाच नाही. त्यामुळेच आपल्याला या अभियानाला त्वरीत प्रारंभ करायचा आहे.
माय वॉटर बँकेचे नेमके फायदे काय, असा प्रश्न आपल्या मनात आला असेल. ते सुद्धा आपण जाणून घेऊ. १) आपली बोअरवेल/विहीर कधीही कोरडी पडणार नाही. भविष्यकाळात आपल्याला व आपल्या मुलाबाळांना पाण्यासाठी कोणावर अवलंबून रहावे लागणार नाही. २) आपल्या बोअरवेल/विहिरीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारेल. ३) आपल्या परिसराची भूजल पातळी वाढेल. व शहराचे तपमान कमी होण्यास मदत होईल. ४) सर्वत्र सिमेंट कॉक्रीय झाल्यामुळे आणि जमिनीत पाणी मुरत नसल्यामुळे आपल्या शहरात, परिसरात जो पूर येतो किंवा पाणी साचते त्यावर मात करण्यास मदत होईल. म्हणजेच दुष्काळ आणि पूर दोन्ही संकटांवर मात करण्यास मदत होईल. ५) नद्या बारमाही होण्यास मदत होईल. ६) एकूणच, आपला स्वतःचा आणि शहराचा फायदा होईल.
नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणवर लोकसहभागातून ही चळवळ चालू झाली आहे. आपणही आपापल्या शहरात ही चळवळ चालू करावी. काही शंका असेल तर आपण केव्हाही माझ्याशी संपर्क करु शकता..