इंडिया दर्पण विशेष – नमामी गोदा
हरित कुंभचे बीजारोपण
२०१५ साली नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा भरला. हा कुंभमेळा हरित कुंभ म्हणून साजरा करण्यात आला. त्याची माहिती आपण गेल्या लेखापासून घेत आहोत. आपण सर्वांनी मिळून हा कुंभमेळा निसर्गाला समर्पित केला. ते कसे शक्य झाले, या हरित कुंभाचे बीजारोपण कसे झाले हे सुद्धा जाणून घेणे गरजेचे आहे….
राष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंग हे वसुंधरा फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने नाशिकला आले होते. त्यांनी हरित कुंभची संकल्पना मांडली. मुंबई उच्च न्यायालयाने गोदावरी पुनरुज्जीवन याचिकेमध्ये तज्ज्ञ म्हणून नागपूरच्या निरी या संस्थेची नेमणूक केली. निरी संस्थेने सूचना केली की, होऊ घातलेला कुंभमेळा हा “ग्रीन इव्हेंट” व्हावा. उच्च न्यायालयाने जी उच्चाधिकार समिती नेमली त्याचे अध्यक्ष हे नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त आहेत. त्यावेळचे तत्कालीन विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी समितीचे अध्यक्ष या नात्याने सर्वानुमते निर्णय घेतला आणि हरित कुंभ असे नामकरण केले. त्यात त्यांनी सर्व सरकारी यंत्रणा जोडून घेतल्या.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोदाकिनारी घेतलेल्या सभेत जाहीर करून टाकले आणि हरित कुंभाला राजाश्रय दिला. तत्कालीन मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हापरिषद मुख्याधिकारी बनकर, त्र्यंबकेश्वर नगरपरिषद, शिक्षण उपसंचालक व सरकारचे सर्वच अधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक संस्था-संघटना, साधू, संत, विद्वान सर्व एकत्र आले. सर्व वृत्तपत्रे तसेच अगदी न्यायालयाचे न्यायाधीश देखील यात जोडले गेले. बघता बघता एक मोठी चळवळ उभी राहिली. आपल्या येथील कुंभमेळा हा वर्षभर चालतो, म्हणून विविध कार्यक्रम देखील वर्षभर चालले..
स्वच्छता मोहिम, वृक्षारोपण, संगोपन, प्लास्टिक बंदी, कापडी पिशव्यांचे वाटप, पथनाट्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा घेतल्या गेल्या. चिन्मय उदगीरकर, धनश्री क्षीरसागर, किरण भालेराव या सिनेअभिनेत्यांनी स्वतःबरोबर अनेक सिने अभिनेते कलाकार मंडळींनी या विषयाशी आणि गोदावरीशी स्वतःला जोडले. उद्देश एकच होता की समाजाचा निसर्गाकडे, गोदावरीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे. सर्वांना एकत्र करून केलेले काम शाश्वत असते, असे डॉ. राजेंद्र सिंग यांनी सांगितले. त्याचप्रमाणे घडत गेले.
अतिशय आनंदाने सांगावस वाटते की, हरित कुंभमध्ये सर्वात मोठे योगदान दिले ते शालेय विद्यार्थ्यांनी. हरित कुंभानिमित्त एक शपथ बनविण्यात आली. ही शपथ एकाच दिवशी नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी घेतली. तब्बल 12 लाख विद्यार्थ्यांनी एकाच वेळी ही शपथ घेतली. खरंतर हा एक विश्वविक्रमच होता. असे अनेक विश्वविक्रम या हरित कुंभात झाले. अन्य विक्रम आणि उपक्रमांबाबत आपण पुढच्या लेखात बघू…