इंडिया दर्पण विशेष – नमामी गोदा – गोदावरी आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग
आज आपण नाशिक शहरातून जाणाऱ्या गोदावरीबाबत समजून घेण्याचा प्रयत्न करूया. गोदावरीला आपल्याला पुनर्वैभव प्राप्त करुन द्यायचे असेल तर आपल्याला घराघरात रेन वॉटर हार्वेस्टिंग करावे लागेल. अनेकांना प्रश्न पडेल की, गोदावरीचा आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगचा नेमका संबंध काय. तोच आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत….
सर्वप्रथम हे समजून घ्यायला हवं की गोदावरीमुळे नाशिक आहे, नाशिकमुळे गोदावरी नाही. गोदावरीमुळे प्रभू रामचंद्र नाशिकला आले, नंतर शुर्पणखेचे नाक कापले गेले आणि म्हणून नाशिक हे नाव पडले. त्यानंतर गोदावरीच्या किनारी वसलेले एक शहर म्हणून नाशिकची ओळख निर्माण झाली.
नाशिकची अध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक उन्नती देखील गोदावरीमुळेच झाली. त्यामुळे जर आपल्याला आपल्या नाशिकचं धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक उत्पन्न टिकवून ठेवायचं असेल तर ते अविरल, निर्मल, स्वतंत्र, मुक्तपणे वाहणाऱ्या गोदावरी शिवाय शक्य नाही. २०१० मधील एक गोष्ट आहे. एका न्यूज चॅनल मधून फोन आला प्रतिक्रीयेसाठी. आसाराम बापू पुलाजवळ गोदावरी नदी पाणवेलीमध्ये गुरफटून ३ म्हशींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांना क्रेनने काढावे लागले होते. गोदावरी नदी दिसतच नव्हती. पूर्णपणे पाणवेली वेढलेली. इथूनच आम्ही या विषयाकडे आकर्षित झालो. खरं तर जोडला गेलो. सर्वप्रथम आम्ही चाळीस-पन्नास जण मिळून दसकाच्या पुलाखाली गोदावरी नदीमध्ये उतरलो.
स्वतः पाणवेली काढली आणि खऱ्या अर्थाने आंदोलनाला सुरुवात झाली. त्यानंतर लहान लहान मुलं देखील बरोबर जोडल्या गेली. चोपडा लॉन्स येथे लाक्षणिक उपोषण, रामवाडी पूल येथे साखळी उपोषण केले. सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना पत्र लिहिली, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनाही भेटलो, अगदी अण्णा हजारे, किरण बेदी आदी मान्यवरांच्या भेटी देखील घेतल्या. त्यानंतर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ माननीय डॉ. राजेंद्र सिंग नाशिकला एका कार्यक्रमाला आले असताना त्यांना सर्व वस्तुस्थिती दाखवली. त्यांनी मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे माननीय उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली.
मला अजूनही आठवतं, माननीय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांचे गोदावरी नदीचे फोटो बघून त्यांनी विचारलेला प्रश्न. ही नदी आहे का. आज आपण गोदावरी बघतो आहोत तिच्या किनारी रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट चालू आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे माननीय उच्च न्यायालयाने वेळोवेळी आत्तापर्यंत दिलेले निर्देश. शासन, प्रशासन आणि समाजाने सुद्धा त्या अनुषंगाने केलेली कामे आहेत. माननीय उच्च न्यायालयाने नीरी नावाच्या प्रज्ञा संस्थेची नेमणूक केली. नीरीच्या सूचनांचे पालन करायला लावले. नीरीने दिलेल्या सूचनांमधील सर्वात पहिली आणि महत्वाची सूचना आहे ती नदीच्या प्रवाहबाबत. त्यासाठी धरणांमधून कुठल्या महिन्यांमध्ये, किती पाणी, किमान सोडायला हवं हे सर्व मांडलेले गणित.
सध्या नदीचा प्रवाह का कमी झाला? हेही समजून घ्यायला हवं. वाढते शहरीकरण, वाढते कॉंक्रिटीकरण, ओढे-नाले बंद होणे, पावसाचे पाणी जमिनीत मुरू नये अशा पद्धतीने केलेला विकास. अशी अनेक कारणे आहेत. माननीय उच्च न्यायालयाने अनेक आदेश दिलेले आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक केलेले आहे. आपल्या घराच्या छतावर पडणारे पाणी जर आपण आपल्याच घरालगतच्या जमिनीमध्ये शक्य असेल तर बोरवेल मध्ये फिल्टर करून सोडले तर गोदावरी बारामही वाढण्यासाठी मदत होईल. शिवाय दुष्काळाच्या काळात टँकरवर अवलंबून राहावे लागणार नाही. आपलंही भलं होईल आणि शहराचंही. कारण त्यामुळे थोडासा पाऊस आला तरी रस्त्यांवरून वाहणाऱ्या पावसाचे प्रमाण कमी होईल.
धरणांमधून पाणी न सोडतासुद्धा गोदावरीला येणारा पूर कमी होईल. गोदावरी बारामही व्हायला मदत होईल. गोदावरी बारामही व्हायला लागली तर प्रदूषणाची तीव्रता देखील कमी होईल. प्रदूषण हा खरं तर एक वेगळाच मुद्दा आहे. याबाबत रेन वॉटर हार्वेस्टिंगचा कायदा तर आहे. परंतु याला जर चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले तर ते सहज शक्य आहे. आणि त्याच्यासाठी आपल्या सर्वांची सोबत गरजेची आहे. आम्ही या चळवळीला सुरुवात केली आहे. त्यात समाजाचे अनेक मान्यवर जोडले गेले आहेत. सरकारी कार्यालयांना तसे आदेश झाले आहेत. यासाठी आमच्या नमामी गोदा फाउंडेशनचे उपाध्यक्ष प्रसिद्ध अभिनेते चिन्मय उदगीरकर यांनी “माय वॉटर बँक” नावाची संकल्पना सुरू केली आहे.
ज्याप्रमाणे आपल्याला बँकेतून पैसे काढताना डिपॉझिट असावं लागतं, त्याचप्रमाणे आपल्या बोअरवेल मधून पाणी काढताना त्या बोअरवेलला रिचार्ज करणे म्हणजेच पावसाचे पाणी रुपी पैसे त्याच्यात डिपॉझिट करणे क्रमप्राप्त आहे. समाजामध्ये खूप लोक आहेत ज्यांना गोदावरीसाठी काहीतरी करायचे आहे. त्यांच्याशी संपर्क करून विचारत असतात. नेमकं काय करावं, आमची त्यांना एकच विनंती आहे, त्यांनी आपल्या छतावर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याचा प्रयत्न करावा. आजूबाजूचे आपल्या ओळखी पाळखीच्या लोकांनाही प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करावा. किमान एक झाड लावावे आणि जपावे. कारण झाड देखील ऑक्सिजन देण्याबरोबर पाणी अडवण्याचे आणि जमिनीत मुरवण्याचे काम करते.