इंडिया दर्पण विशेष लेखमाला – खेळाच्या मैदानातून
दुसरा तेंडुलकर की पहिला सर्फराज खान?
भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळावे म्हणून धडपड करणारे भरपूर खेळाडू आहेत पण “माझ्या नशीबात असेल तर माझी भारतीय संघात निवड झाल्याशिवाय राहणार नाही. निवड होण्यासाठी मी इतर कोणतेही खास प्रयत्न करीत नाही. फक्त खेळावर लक्ष केंद्रित करतो” असे म्हणणारा एकमेव खेळाडू म्हणजे मुंबईकडून गेली दोन वर्षे धावांची अक्षरशः रास ओतणारा उजव्या हाताने फलंदाजी करणारा सर्फराज खान हा मधल्या फळीतील फलंदाज.
मागील मोसमात ( १९ /२० ) मध्ये त्याने १५४:५६ च्या जबरदस्त सरासरीने ९२८ धावा केल्या त्यात उत्तर प्रदेश वि ३०१, हिमाचल वि २२६, सौराष्ट्र वि ७८ आणि २५ आणि मध्य प्रदेश वि १७७ धावांचा पाऊस पाडला. हा धडाका पाहून क्रिकेट शौकीन चकीत झाले पण त्यांना असे वाटले की, एखादा खेळाडू एखाद्या मोसमात खेळून जातो. त्याची फार दखल घ्यायची गरज नाही!
तथापि याही रणजी मोसमात (२१/२२ ) सर्फराजचा धमाका तसाच चालू आहे हे पाहिल्यावर मात्र हा दुसरा तेंडुलकर तर नाही असे लोक म्हणू लागले आहेत. सर्फराजच्या चालू क्रिकेट रणजी मोसमातील धावा (एकूण आतापर्यंत धावा ७०४) बघा; सौराष्ट्र वि २७५ वि गोवा ६३ आणि ४८, वि ओरिसा १६५ आणि उत्तराखंड वि नाबाद १५३. आजपासून ( मंगळवार १४ जून) रणजी उपान्त्य फेरीचे सामने सुरु होत आहेत आणि मुंबई ची गाठ उत्तर प्रदेश विरूध्द आहे . आता हा काय करतो इकडे सगळ्याचे डोळे लागले आहेत.
त्याला ताबडतोब भारतीय संघात घ्यावे असे वेंगसरकर आणि संजय मांजरेकर तसेच शास्त्री सह अनेक खेळाडूचे मत आहे . खरं तर त्याचे वय २४ आहे आणि शरीर स्थूल आणि थुलथुलीत आहे. म्हणजे कसोटी क्रिकेटपटू आजच्या अति- फिटनेसच्या जमान्यात कसा नसावा हेच वाटेल. पण एकदा तो मैदानावर उतरला आणि त्याची शैलीदार आणि धुँवाधार फलंदाजी पाहिली की प्रेक्षक बाकी सगळ्या गोष्टी विसरून जातो आणि फक्त त्याच्या तुफानी, धडाकेबाज फलंदाजीवर फिदा होऊन जातो. सर्फराज आतापर्यंत फक्त १० रणजी सामने खेळला आहे आणि त्यात एक त्रिशतक, दोन द्विशतके आणि तीन शतके आहेत तीही १५०+.
त्याचे वडीलच ( नौशाद खान) त्याचे प्रशिक्षक आहेत. ते त्याला दिवसात तीन वेळा २-२ तास नेट प्रक्टीस करायला लावतात आणि जवळजवळ ६००-७०० चेंडू त्याला खेळायला लावतात असे सर्फराज सांगतो. २०१५ पासून म्हणजे अंडर 19 पासून तो मुम्बईत खेळतो आहे पण तीव्र स्पर्धेत मुम्बई संघात खेळायला मिळणे अवघड आहे हे लक्षात आल्यावर तो दोन मोसम उत्तर प्रदेश कडून खेळला पण त्याचे तिकडे त्याचे मन रमले नाही आणि म्हणून मनासारखा खेळही होत नाही हे पाहून तो परत मुबंईत परतला . दरम्यान कोविडमुळे एक मोसम वाया गेला त्यामुळे वय आणि शरीर वाढले तथापि प्रचंड गुणवत्ता असल्याने काहीच फरक पडला नाही .
त्याचे रन- मशिन पुन्हा दणक्यात सुरु झाले आहे. तो आता बचाव आणि आक्रमण या दोन्हीतही तरबेज झाल्याने फक्त मर्यादित षटकांचे सामनेच नव्हे तर कसोटीतही भारतीय संघाचा दरवाजा ठोठावत आहे. अपेक्षेपेक्षाही लवकरच भारतीय संघात त्याने पदार्पण केल्यास आश्चर्य वाटू नये.