अरबी समुद्रातील तोत्के चक्रीवादळाच्या अनुषंगाने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी तसेच विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावे अशा सूचना प्रशासनास दिल्या आहेत. विशेषत: पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्याने जिल्हाधिकारी यांनी सज्ज राहावे व मनुष्यबळ तसेच्या साधन सामुग्री तयार ठेवावी, असेही मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीत सांगितले. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या पूर्वतयारीच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा घेतला. राज्य सरकार हवामान विभागाच्या संपर्कात असून सर्व यंत्रणा सज्ज आहेत. केंद्र सरकार आणि हवामान विभागाने महाराष्ट्रालाही हायअलर्ट जारी केला आहे. त्याची दखल घेत महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती दल, राज्य आपत्ती दल, आपत्ती व्यवस्थापन विभागासह सर्व सरकारी विभाग सज्ज आहेत. चक्रीवादळाचा जसा प्रवास (वेग आणि दिशा) असेल त्या दृष्टीने नागरिकांना तातडीने सतर्क केले जाणार आहे. जिवीतहानी होऊ नये यासाठी सज्ज राहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिली आहेत.