मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठा आरक्षणासंदर्भात अखेर आज छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. संभाजीराजे म्हणाले की, आता माझा संयम संपला आहे. गेल्या १३ ते १४ वर्षांपासून मी मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र पिंजून काढला. मी मराठा असल्यामुळेच मराठा आरक्षणासाठी लढतो आहे. गेल्या वर्षी मे मध्ये मराठा आरक्षण रद्द झाले. त्यानंतर अनेक बैठका झाल्या. सरकारकडे विनंती झाली. आश्वासने मिळाली. पण, आता मी उद्विग्न झालो आहे. त्यामुळेच येत्या २६ फेब्रुवारीपासून मी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे.
मराठा आरक्षणाबाबत मला कुठलीच आश्वासक बाबी घडताना दिसत नाही. टोकाची भूमिका न घेण्याचे मी निश्चित केले होते. सरकारला सर्वतोपरी सहकार्य केले. सर्वपक्षीय नेत्यांना मी यापूर्वी आणि आताही विनंती केली ही राजकारण नको आरक्षण द्या. मात्र, काहीच हालचाली होत नाहीय. सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली पण अद्याप त्याची सद्यस्थिती काय हे माहित नाही. संथ कारभारामुळे वंचित मराठा विद्यार्थी आणि बांधव यांना कुठलाही दिलासा मिळत नाहीय. आमच्या प्रमुख पाच ते सहा मागण्या आहेत. मात्र, त्या सुद्धा मान्य होत नाही. त्याबाबत काहीही होताना दिसत नाही, असेही संभाजीराजे म्हणाले.
छत्रपती संभाजीराजे यांची संपूर्ण पत्रकार परिषद पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
#मराठा_आरक्षण व समाजाच्या इतर अनुषंगिक मागण्यांबाबत समाजातील सर्व क्षेत्रातील मुख्य घटकांशी विचार विनिमय करून मी माझी पुढील दिशा ठरविलेली आहे ; याबाबतची सविस्तर पत्रकार परिषद… https://t.co/nodCzPv7V5
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 14, 2022