इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागरी विमान वाहतूक सुरक्षा संस्थेने (BCAS – Bureau of Civil Aviation Security) राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित कारणांमुळे मेसर्स सेलेबी (M/s Celebi) आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांची सुरक्षा विषयक मंजुरी रद्द केली आहे.
आपल्या देशाच्या आणि आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेपेक्षा इतर कोणतीही गोष्ट मोठी नाही, असे या निर्णयासंदर्भात केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय हित आणि सार्वजनिक सुरक्षा सर्वोच्च स्थानावर असून, त्यासोबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.
त्याच वेळी, नागरी विमान वाहतूक मंत्रालय हे प्रवासी सुविधा, विमान मालवाहतूक आणि सेवांची सातत्यपूर्णता सुनिश्चित करण्यासाठी पूर्णतः वचनबद्ध आहे. त्या दृष्टीनेच या निर्णयामुळे प्रभावित विमानतळांवर प्रवाशांची तसेच वस्तूमालाची सुरळीतपणे हाताळणी होईल याची सुनिश्चिती करण्याच्या अनुषंगाने योग्य व्यवस्थाही केली गेली आहे.
यासंदर्भात केंद्रीय मंत्री स्वतः जातीने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत तसेच या निर्णयानुसारची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली जावी यासाठी मंत्रालयाच्या वतीने विमानतळ परीचालकांसोबत सक्रियपणे समन्वय राखून काम करत आहे. सेलेबीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती कायम राखली जाईल आणि त्याचे काम करत राहतील याची सुनिश्चिती करण्याच्या दिशेनेही प्रयत्न केले जात आहेत.
कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी आणि उद्भवणाऱ्या कोणत्याही समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी विशेष पथके तैनात केली जात असल्याची माहितीही केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांनी दिली. देशभरात प्रवास सुलभतेसह, विमान मालवाहतूक सुरळीत सुरू राहील याची सुनिश्चित करण्यासोबतच आम्ही राष्ट्रीय सुरक्षेचीही जपणूक करू असेही त्यांनी म्हटले आहे.