इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – आपल्या सहसुंदर अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात ज्या अभिनेत्रींनी स्थान मिळवलं आहे, त्यांच्यात रेणुका शहाणे यांचा समावेश करावाच लागेल. ‘सुरभी’ कार्यक्रमामुळे ही गुणी अभिनेत्री घराघरात पोहोचली. आपल्या कामाने त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही आपला दबदबा निर्माण केला आहे. रेणुका सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. परखड मतं मांडत असल्याने रेणुका चर्चेत असते. सहजसुंदर अभिनय, सात्विक सौंदर्यानं बॉलीवूडमध्ये ज्या अभिनेत्रींनी स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे, त्यात रेणुका शहाणे यांचा आवर्जून समावेश होतो.
दूरदर्शनवरील ‘सुरभी’ कार्यक्रमातून रेणुका यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. सिद्धार्थ काक यांच्याबरोबरची त्यांची जोडी खूप लोकप्रिय झाली. या दोघांचं ओघवतं निवेदन, बोलण्याची पद्धत आणि साधेपणा यांमुळे हा कार्यक्रम खूप लोकप्रिय झाला. सुरभी कार्यक्रमानंतर रेणुका यांनी सर्कस, सैलाब यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं. त्याशिवाय त्यांनी अंतारक्षरीचं निवेदनही केलं होतं. रेणुका यांनी मालिकांबरोबर अनेक सिनेमांतही काम केलं. त्यांचा सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला सिनेमा म्हणजे ‘हम आपके हैं कौन’. या सिनेमामुळे रेणुका यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.शिवाय एक प्रेमळ वहिनी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.
रेणुका शहाणे यांनी अभिनेता आशुतोष राणा यांच्याशी लग्न केलं. या दोघांचा प्रेमविवाह. त्यांची लव्हस्टोरी देखील एकदम फिल्मी होती. खरं तर हिरोसारखा एखादा आपला जोडीदार असावा, अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. पण इथे तर रेणुका एका खलनायकावर जीव जडवून बसल्या आणि त्यांच्याशी लग्न केलं. लहान वयात त्यांना अनेक ताणतणांवाना सामोरं जावं लागलं होतं. रेणुका यांनी आशुतोष यांच्याबरोबर दुसरं लग्न केलं. रेणुका यांचं पहिलं लग्न प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांच्याशी झालं होतं. परंतु त्या दोघांचं नात फार काळ टिकलं नाही आणि ते विभक्त झाले. त्यानंतर रेणुका यांच्या आयुष्यात आशुतोष आले.
रेणुका आणि आशुतोष यांची पहिली भेट दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या ‘जयते’ सिनेमाच्या सेटवर झाली. आशुतोष रेणुका यांना ओळखत होते. पहिल्या भेटीमध्येच आशुतोष रेणुका यांच्या प्रेमात पडले. दोघांमध्ये मैत्री झाली. एकमेकांचे फोन नंबरची देवाणघेवाण झाली.
त्यानंतर दोघांमध्ये एकमेकांशी बोलणं सुरू झालं आणि हळूहळू त्यांच्यात प्रेम फुलू लागलं. आशुतोषने रेणुकासाठी खास कविता सादर करत प्रेमाची कबुली दिली होती. २००१ मध्ये दोघांनी लग्न केलं. आशुतोष आणि रेणुका यांना दोन मुलं आहेत. रेणुका आशुतोष यांना राणाजी म्हणून हाक मारतात. राणाजी आपल्या आयुष्यात आल्यामुळे खूप बदल झाले. त्यांच्यासारखा उत्तम जोडीदार असूच शकत नाही, असं मत रेणुका यांनी एका मुलाखतीमध्ये व्यक्त केलं होतं.
रेणुका यांनी हिंदीबरोबरच अनेक मराठी सिनेमांतही काम करत लोकप्रियता मिळवली. ‘हम आपके है कौन’, सिनेमा रेणुका यांचा खूप आवडता असल्याचं खुद्द रेणुका यांनी सांगितलं होतं. रेणुकाला १९९४ साली ‘अबोली’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. हाच सूनबाईचा भाऊ’ या मराठी सिनेमाच्या माध्यमातून रेणुकाने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.
Bollywood Actress Renuka Shahane Love Story