पाटणा – महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश पाठोपाठ आता बिहार मध्ये देखील महापुराचा फटका बसला असून सर्वत्र हाहाकार उडाला आहे. विशेषत: राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये या पुरामुळे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत सात लोकांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. पूर बाधित लोकांकरिता केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
गेल्या २४ तासांच्या आत नवीन भागात सर्वत्र पाणीच पाणी पसरल्याने राज्यातील साडेतीन लाख पुन्हा नवीन लोकसंख्येला पुराचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे महापुरामुळे बाधित झालेल्या लोकांची एकूण संख्या २० लाख ४० हजारांवर पोहोचली. सर्व बाधीत लोक त्याच १५ जिल्ह्यांतील असून येथे पुराचा मोठा प्रभाव आहे. आता त्या जिल्ह्यांच्या एकूण ५७० गावे पुरामुळे अंशतः किंवा पूर्णपणे प्रभावित झाले आहेत. या पुरामुळे मृतांची संख्याही सात झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने या जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरु केले आहे. गंगा सह, सर्व प्रमुख नद्यांच्या पाण्याच्या पातळीचे जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांकडून सतत निरीक्षण केले जात आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या म्हणण्यानुसार, हालचाली सुरू ठेवण्यासाठी आणि अत्यावश्यक साहित्य पोहोचवण्यासाठी प्रभावित भागात चालणाऱ्या बोटींची संख्या १९४८ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
गरजेनुसार पॉलिथीन शीट आणि कोरडे रेशन पॅकेट वितरीत करण्यात आले आहेत. याशिवाय, सर्व जिल्ह्यांमध्ये पिकांच्या नुकसानीचे मूल्यांकन केले जात आहे. मूल्यांकनानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. प्रभावित भागात २५४ ठिकाणी सामुदायिक स्वयंपाकघर चालवले जात आहेत. तसेच पाटणा व्यतिरिक्त, वैशाली, भोजपूर, लखीसराय, मुजफ्फरपूर, दरभंगा, खगरिया, सहरसा, भागलपूर, सारण, बक्सर, बेगुसराय, कटिहार, मुंगेर आणि समस्तीपूर जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. या जिल्ह्यांमध्ये बचाव कार्यांसाठी एनडीआरएफच्या आठ टीम आणि एसडीआरएफच्या नऊ टीम तैनात करण्यात आल्या आहेत.