नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील भगर मिल उद्योजक आणि सोनपरी या प्रख्यात ब्रँडचे निर्माते महेंद्र छोरीया यांना पोषक अनाज पुरस्काराने आज गौरविण्यात आले. हायटेक्स इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (HICC) हैदराबाद येथे न्युट्रिहब, आयआयएमआर यांच्यातर्फे “न्यूट्री-सेरियल्स मल्टी-स्टेकहोल्डर्स मेगा कन्व्हेन्शन” हा भव्य समारंभ आयोजित करण्यात आला. याअंतर्गत छोरीया यांना ‘पोषक अनाज या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सलग दुसऱ्यांदा छोरीया यांना हा पुरस्कार मिळाला आहे. भगर उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये अत्याधुनिकरण करणे, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगली संधी निर्माण करणे, राष्ट्रीय पातळीवर सोनपरी हा उत्कृष्ट ब्रँड नावारुपाला आणणे याबद्दल छोरीया यांना गौरविण्यात आले आहे. या पुरस्काराने गौरविण्यात आलेले छोरीया हे महाराष्ट्रातील एकमेव उद्योजक आहेत. तृणधान्य क्षेत्रातील विविध अडी-अडचणी आणि समस्या सरकारपर्यंत जाणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने त्या क्षेत्रातील विविध व्यक्तींच्या सूचना जाणून घेतल्या जात आहेत.
२०२३ हे वर्ष तृणधान्य वर्ष (आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्ष) म्हणून घोषित करण्यात आले आहे. भगर हे सुद्धा तृणधान्य आहे. तृणधान्याच्या इको-सिस्टीममध्ये काम करणाऱ्या भागधारकांना व्यासपीठावर एकत्र आणणे, तसेच उत्पादक आणि ग्राहकांमध्ये तृण धान्याबद्दल जागरूकता निर्माण करणे, या हेतूने या क्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना हैदराबाद येथे सन्मानित करण्यात आले.
महेंद्र छोरिया यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर सांगितले की, राज्याच्या आदिवासी आणि दुर्गम भागात भगरीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकरी, त्यावर प्रक्रिया करणारे उद्योजक, तृणधान्य विक्री करणारे व्यावसायिक आणि आरोग्य जपण्यासाठी तृणधान्याचा आहारात समावेश करणाऱ्या ग्राहकाचा हा सन्मान आहे. पुरस्काराने आमची जबाबदारी अधिक वाढली आहे. यापुढील काळात आम्ही आणखी दर्जेदार आणि ग्राहक केंद्रीत व्यवसाय करु.
Bhagar Mill Industrialist Mahendra Chhoriya National Award