इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – टोमॅटोचे दर १०० ते २०० रुपये प्रति किलो झाल्याने त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. खासकरुन सोशल मिडियात टोमॅटो हा अत्यंत चर्चेचा विषय बनला आहे. अशातच आंध्र प्रदेशातून एक गंभीर बातमी समोर आली आहे. आंध्र प्रदेशमध्ये टोमॅटो उत्पादक शेतक-याची हत्या करण्यात आली आहे. अन्नामय्या जिल्ह्यात वास्तव्यास असलेले नरेश राजशेखर रेड्डी (६२) यांचा मृतदेह मदनपल्लेमधील बोडिमल्लादिने गावात सापडला आहे. रेड्डी यांना टोमॅटो विक्रीतून ३० लाख रुपये मिळाले होते. याच पैशांसाठी त्यांची हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
टोमॅटोचे दर भडकल्याने वेगवेगळ्या घटना समोर येत आहे. नरेश रेड्डी हे दूध विक्री करण्यास जात होते. त्यावेळी हल्लेखोरांनी त्यांना रस्त्यात गाठले. त्यानंतर त्यांचे हात-पाय हल्लेखोरांनी बांधून टॉवेलने त्यांचा गळा आवळला. या हत्येनंतर रेड्डी यांच्या पत्नीने पोलिसांना माहिती देतांना सांगितले की, काही अज्ञात लोक टोमॅटो खरेदी करण्याच्या बहाण्याने शेतात आले. त्यांनी रेड्डी यांच्याबद्दल विचारणा केली. पती गावात गेल्याचे सांगितल्यानंतर हे अज्ञात लोक निघून गेले.
रेड्डी यांना यांनी कृषी उत्पन्न बाजारपेठेत टोमॅटो विकून ३० लाख रुपये मिळाले होते. त्यामुळे त्यांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. ते बाहेर गेल्यानंतर त्यांच्याकडे काही पैसे होते का, याचाही शोध पोलीस घेत आहेत. या हत्येचा तपास लावण्यासाठी पोलिसांनी चार पथक तयार केली आहेत.