मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाकडून इच्छुक असलेल्या ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीबाबत आज मोठा निर्णय झाला आहे. ऋतुजा या मुंबई महापालिकेत नोकरीला आहेत. निवडणुकीसाठी त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, तो मुंबई महापालिकेने मंजूर न केल्याने लटके यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर आज सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने लटके यांना मोठा दिलासा दिला आहे.तसेच मुंबई महापालिकेला निर्देश दिले की लटके यांचा राजीनामा स्वीकारत असल्याचे पत्र देण्यात यावे.
अंधेरी पूर्व मतदार संघातील आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेटवची मुदत उद्या, १४ ऑक्टोबर रोजी आहे. उद्धव ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. तर भाजपच्यावतीने माजी नगरसेवक मुरजी पटेल यांना संधी दिली जाणार असल्याचे बोलले जाते. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाकप यांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.
६ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र अंधेरी पोटनिवडणुकीत आता एक ट्विस्ट समोर आला. ऋतुजा लटके यांना अडचणीत आणण्यासाठीच त्यांचा राजीनामा मंजूर केला जात नसल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. शिंदे गटाची सत्ता असलेल्या राज्य सरकारचा मुंबई महापालिकेवर दबाव असल्याचेही ठाकरे गटाने म्हटले आहे.
ऋतुजा लटके या महापालिका परिमंडळ उपायुक्तांच्या कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांचा राजीनामा तात्काळ मंजूर व्हावा यासाठी अनिल परब यांनी देखील पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची भेट घेतली. एक महिना आधी नोटिस वा राजीनामा देणे आवश्यक आहे. मात्र, तो न दिल्याने त्यासाठी आवश्यक तो आर्थिक दंड भरण्यास लटके तयार आहेत. तरीही महापालिकेकडून राजीनामा मंजूर केला जात नसल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. याचाच एक भाग म्हणून लटके यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
आज झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला प्रश्न विचारला की, तुम्ही अद्याप राजीनामा मंजूर का केला नाही. काय अडचण आहे. त्यानंतर महापालिकेच्या वकिलांनी बाजू मांडली. लटके यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप आहे. त्याची चौकशी सध्या सुरू आहे. त्यावर लटके यांचे वकील म्हणाले की, चौकशी होत राहिल पण, आधी राजीनामा मंजूर करुन घेण्याची विनंती आहे. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या वकीलांनी स्पष्ट केले की, लटके यांच्या उमेदवारीला मुंबई महापालिकेचा विरोध नाही. त्या उमेदवारी अर्ज भरु शकतात. यावर लटके यांचे वकील म्हणाले की, जोपर्यंत राजीनामा स्विकारला जात नाही तोवर अर्ज वैध समजला जात नाही.
राजीनाम्यासाठी १ महिन्याचा कालावधी अनिवार्य आहे. लटके यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची तक्रार काल म्हणजे १२ ऑक्टोबर रोजी दाखल झाली आहे. प्रशासन कुणाचाही राजीनामा तातडीने स्विकारत नाही, असे मुंबई महापालिकेच्या वकीलांनी स्पष्ट केले. पैसे भरले म्हणून नोटिस कालावधी कमी करण्याची मागणी करता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.
असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम..
निवडणुकीच्या नियोजित कार्यक्रमानुसार १४ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्रे सादर करणे, १५ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी, १७ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. तर ३ नोव्हेंबर रोजी मतदान, ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी व ८ नोव्हेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मतदारांची ओळख पटावी म्हणून नेमकी कोणती ओळखपत्रे लागतील, त्याची यादी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.
Andheri ByPoll Election Thackeray Group Rutuja Latake High Court Order
BMC Resignation