नवी दिल्ली – महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठासमोर महत्त्वाची सुनावणी होणार आहे. आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा, राज्यपाल आणि विधानसभा उपाध्यक्षांचे अधिकार, पक्षांतरबंदी कायदा अशा महत्वाच्या मुद्द्यांवर या सुनावणीत दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगात केलेल्या दाव्याबाबत न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे ही सुनावणी होणार आहे. न्या. धनंजय चंद्रचूड यांचे हे घटनापीठ असून, यात न्या. एम.आर. शाह, न्या. हिमा कोहली, न्या. नरसिंहा, न्या. कृष्ण मुरारी यांचा समावेश आहे. खंडपीठापुढे शिवसेनेने केलेल्या याचिकेत शिंदे गटाच्या १६ आमदारांना निलंबित करण्याची नोटीस उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी बजावली होती, या आमदारांना निलंबित करावे ही मागणी आहे. त्याचप्रमाणे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या व्हिपला मान्यता दिली होती, त्याविरोधातील याचिका आहे. याबरोबरच विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी बोलावलेले अधिवेशन बेकायदा होते, असा दावा शिवसेनेने याचिकेत केला आहे. तर शिंदे गटाने उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिंदे गटाच्या १६ आमदारांना निलंबित करण्यासाठी बजावलेल्या नोटीसविरोधात याचिका दाखल केली आहे. त्याचबरोबरच इतर याचिका आहे. या सर्व याचिकेवर या सुनावणीत काय होते ते थोड्याच वेळात कळणार आहे.