इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – येथील रहिवासी अभिषेक सिंह यांच्या लग्नाची वरात आलमबागवरून कानपूरला गेली होती. लग्न सुरळीत आनंदात पार पडले आणि वधू वराने उपस्थितांचा निरोप घेतला. पण अभिषेक नवीन नवरीला घेऊन न जाता डेंटल कॉलेजमध्ये घेऊन गेला. जेव्हा हा प्रकार लोकांना समजला, तेव्हा सगळीकडेच हशा पिकला.
लग्न आणि त्याच्याशी संबंधित विधी हे वधू-वरांच्या आयुष्यातील संस्मरणीय क्षण असतात, हे क्षण कायम आठवणीत जपून ठेवले जातात. अभिषेक आणि किर्तीसाठी हे क्षण आणखीनच संस्मरणीय ठरले. लग्नाच्या दिवशीच अभिषेकची सकाळी ११ वाजता बीडीएसच्या अंतिम वर्षाची परीक्षा होती. त्याला काहीही करून परीक्षेला उपस्थित रहायचे होते. लग्नाच्या विधींमुळे त्याला परीक्षेला जायला उशीर झाला होता. त्यामुळे लग्नाचे विधी पार पडल्या पडल्या अभिषेक वधूसोबत थेट परीक्षेला गेला. दोघेही लग्नाच्या कपड्यांमध्येच कॉलेजमध्ये पोहोचले. हे दृश्य ज्याने पाहिले ते क्षणभर चकित झाले.
वय अभिषेकला वाटले की, आता विधी पूर्ण करून घरी जायला उशीर होईल आणि परीक्षाही चुकू शकेल. यामुळे वर अभिषेकने नंतर घरातील विधी करण्याचे ठरवले. वधूला सोबत घेऊन थेट रायबरेली रोड येथील परीक्षा केंद्र असलेल्या दंत महाविद्यालय गाठण्याचा निर्णय घेतला. वराच्या या निर्णयाला वधू किर्तीनेही साथ दिली. अभिषेकची परीक्षा संपेपर्यंत ती गाडीत बसून राहीली. लग्नानंतर थेट परीक्षा देण्याचा हा प्रकार त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला. परीक्षेनंतर सर्व विद्यार्थ्यांनी त्याच्यासोबत ग्रुप फोटो काढला आणि त्याच्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या. पुढे घरी जाऊन त्यांनी बाकीचे विधी पूर्ण केले. अभिषेकने लग्न आणि परीक्षा दोन्हीला योग्य न्याय दिल्याने त्याचे सगळ्यांनीच कौतुक केले.