मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर आता पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आपल्यालाच मिळावे, यासाठी रस्सीखेच सुरू आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडेही धाव घेण्यात आली आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, निवडणूक आगोयाने धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घ्यावा. आणि आता अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. परिणामी, या निवडणुकीत धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे यांना मिळणार की शिंदे गटाला असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासंदर्भात ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी माहिती दिली आहे.
दोन्ही गटांना निवडणूक चिन्ह आपल्यालाच मिळण्यासाठी तातडीने पुरावे सादर करावे लागतील, अन्यथा धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून गोठवले जाऊ शकते, असा अंदाज ज्येष्ठ विधिज्ञ तथा कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांनी व्यक्त केला आहे. सध्या मुंबईतील अंधेरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांचे १२ मे रोजी निधन झाल्याने या जागेसाठी ही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. पण शिवसेनेच्या कोणत्या गटाकडून उमेदवार उभा केला जाईल आणि ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह कोणाला मिळेल? याची सध्या जोरात चर्चा सुरू आहे.
या पोटनिवडणुकीत भाजपासह शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून उमेदवार जाहीर केले, तर धनुष्यबाण चिन्हाबाबत पेच निर्माण होईल. या पार्श्वभूमीवरच निवडणूक चिन्हाबाबत एकनाथ शिंदे गटाची घाई सुरु आहे. आता या पोटनिवडणुकीत चिन्ह मिळावे म्हणून दोन्ही गटाकडून आयोगात धाव घेतली जाईल. त्यावर आयोग दोन्हीकडच्या बाजू लक्षात घेऊन कदाचित निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्ह हे ठाकरे किंवा शिंदे यापैकी एका गटाला देण्याचा निर्णय घेऊ शकतात. किंवा पक्षचिन्ह गोठवण्याचा निर्णय घेऊ शकतात. त्यानंतर दोन्ही गटांना नवीन चिन्ह दिले जाऊ शकते. हा निर्णय शिंदेंसाठी तितकासा फटका बसणारा नसला, तरी उद्धव ठाकरेंना मोठा हादरा बसू शकतो. कारण धनुष्यबाण ही शिवसेनेची निशाणी आहे आणि ती बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून महत्त्वाचे मानली जाते. साहजिकच शिवसेना कार्यकर्ते तसेच जनतेच्या मनात शिवसेना म्हणजेच धनुष्यबाण त्याचप्रमाणे धनुष्यबाण म्हणजेच शिवसेना समीकरण कायम आहे.
खरी शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कोणाला मिळणार, निवडणूक आयोग कशाच्या आधारे निर्णय घेणार, हे प्रश्न अनेकांना पडले आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना अॅड. उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले की, निवडणूक चिन्ह किंवा राजकीय पक्षाची मान्यता हा विषय केंद्रीय निवडणूक आयोगानेच सोडवायचा आहे. सध्या शिवसेनेत दोन गट झाले आहेत. त्यामुळे या गटांपैकी एकाच गटाकडून उमेदवार जाहीर होणार की दोन्ही गटाकडून उमेदवार उभे केले जातील, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. समजा कदाचित दोन्ही गटांनी एकत्र विचार करून एकच उमेदवार ठरवला, तर निवडणूक चिन्हाबाबत वाद निर्माण होणार नाही.
परंतु दोन्ही गटांनी निवडणुकीत आपले उमेदवार जाहीर केले तर निवडणूक चिन्ह कोणाला द्यायचे? याचा निर्णय निवडणूक आयोगाला घ्यावा लागेल. त्यासाठी दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगासमोर पुरावे सादर करावे लागतील. अंधेरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या आधी दोन्ही गटांना निवडणूक आयोगासमोर पुरावे सादर करता आले नाहीत. तर आयोगापुढेच एकच पर्याय राहणार असून त्यामुळे निवडणूक चिन्ह चिन्ह गोठवले जाऊ शकते, असे मत उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे.
Advocate Ujjwal Nikam Shivsena Party Symbol
By Poll Election Andheri Constituency