मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मासिक पाळी हा स्त्रियांच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा किंवा विषय मानला जातो. आजच्या काळात मासिक पाळी अगदी उत्सव म्हणून देखील साजरा करण्याची प्रथा झाली आहे. परंतु काही वर्षांपूर्वी मासिक पाळी संदर्भात खूपच गैरसमज होते, अगदी त्याविषयी उघडपणे बोलणे देखील स्त्रिया टाळत असत. पूर्वीच्या काळातील स्त्रियांच्या समस्या, समाजात वावरताना येणारे अनुभव याबद्दल अनेकजणी बोलताना दिसतात.
बॉलिवूडमध्ये तर ‘पॅडमॅन’ सारख्या चित्रपटातून या विषयावर जनजागृती करण्याचा प्रयत्न झाला. पण आजही अनेक स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात वेगवेगळे अनुभव येतात, वेगवेगळे सल्ले दिले जातात. सामान्य स्त्रियांपासून ते अगदी बॉलिवूड अभिनेत्रींनाही मासिक पाळीच्या काळात वेगवेगळे सल्ले मिळाले आहेत.
अद्यापही आपल्या काही समाजात स्त्रियांची मासिक पाळी हा एक असा विषय आहे ज्यावर उघडपणे काही बोललं जात नाही, अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत आणि पुरुष तर जाऊदे पण स्त्रिया देखील ह्या विषयावर जागरुकतेने बोलणं, नीट शास्त्रोक्त माहिती करून घेणं टाळतात.
काही समाजात पाळी आलेल्या स्त्रीला बाजूला बसवण्याची प्रथा आहे. चार दिवस तिने कुणालाही शिवायचे नाही, घरातल्या कुठल्याही वस्तूंना, ठेवणीतल्या पदार्थांना हात लावायचा नाही असे अनेक घरांमध्ये पाळलं जातं. पाळी आलेल्या स्त्रीने हात लावला तर लोणचं खराब होतं इथपासून ते तिनी कोणाला हात लावला तर देवांचा प्रकोप होतो इथपर्यंत वाटेल ते गैरसमज आहेत.
वयात आलेल्या प्रत्येक स्त्रीच्या गर्भाशयाच्या आतल्या भागाला पेशी आणि रक्ताचे एक अस्तर असते. हे अस्तर ती स्त्री गरोदर झाली असता गर्भाच्या पोषण आणि संरक्षणाकरता वापरले जाते. परंतु जर ती स्त्री गरोदर नसेल तर ते अस्तर गर्भाशयातून योनिमार्गाद्वारे बाहेर टाकले जाते. आणि नवीन अस्तर तयार होते. ही प्रोसेस दर महिन्याला घडते. त्यामुळे गरोदर नसलेल्या प्रत्येक स्त्रीला प्रत्येक महिन्याला योनिमार्गातून असा रक्तस्त्राव होतो. त्यालाच मासिक पाळी असे म्हणतात.
मासिक पाळीची सुरुवात किशोरावस्थेतील ९ ते १५ वर्षे वयाच्या मुलींमध्ये दिसून येते. आणि साधारणपणे वयाच्या ४५ ते ५५ वर्षांपर्यंत स्त्रियांना पाळी येते. त्यांनंतर पाळी येणे बंद होते. मासिक पाळी ही साधारणपणे दर २८ ते ३० दिवसांनी येते. रक्तस्त्राव ३ ते ५ दिवस होतो.पहिले २ दिवस त्याचे प्रमाण जास्त असते. गर्भधारणा झाली नाही तर पुन्हा पुढील महिन्यात मासिक पाळी येऊन रक्तस्त्राव होतो.
काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टनं स्त्रियांच्या मासिक पाळीवर भाष्य केलं होतं. एका मुलाखतीत आलिया म्हणाली होती, “जेव्हा मासिक पाळीच्या काळात स्रियांना धार्मिक स्थळांवर प्रवेश नाकारला जातो तेव्हा मला वाईट वाटतं. अशी कोणत्याही प्रकारची अट त्यांच्यासाठी असणं चुकीचं आहे. जर मासिक पाळीमुळे नव्या जीवाचा जन्म होतो तर मग महिलांच्या मासिक पाळीला अशुद्ध कसं काय म्हटलं जाऊ शकतं.”
आलिया व्यतिरिक्त सोनम कपूरनेही मासिक पाळीच्या काळात आलेले अनुभव शेअर केले होते.एका मुलाखतीत सोनम कपूरनं मासिक पाळी संबंधी तिचा अनुभव शेअर केला होता. ती म्हणाली होती, “मी १५ वर्षांची होते जेव्हा मला पहिल्यांदा मासिक पाळी आली. त्यावेळी मला घरातील काही ठिकाणी जाण्याची परवानगी नव्हती. माझी आजी मला सांगायची स्वयंपाक घरात जाऊ नकोस, देवघराच्या आसपास जाऊ नकोस. जिथे लोणचं ठेवलेलं असेल त्याचा आजूबाजूला फिरू नकोस.
सोनम पुढे म्हणाली की, मी मुंबई सारख्या शहरात लहानाची मोठी झाले तरीही मला या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागत होत्या तर मग विचार करा गावातील मुलींना किती काय काय सहन करावं लागत आहे.” दरम्यान, मासिक पाळीच्या काळातील अनुभवांबाबत बोलणारी सोनम कपूर एकमेव अभिनेत्री नाही. तिच्या व्यतिरिक्त अभिनेत्री राधिका आपटे, करीना कपूर खान आणि श्रद्धा कपूर यांनीही मासिक पाळीबाबतचे आपापले अनुभव शेअर केले आहेत.
Actress Sonam Kapoor Menstrual Cycle Experience