मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलिवूडमधील तारे-तारकांच्या विषयी अभिनयाविषयी रसिकांना जशी उत्सुकता असते, तशीच उत्सुकता त्यांच्या खासगी जीवनाविषयी देखील असते. कुणाकडे किती संपत्ती आहे? कोणाचा बंगला कसा आहे? याची ही चर्चा नेहमीच होत असते. मग प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मन्नत बंगला असो की बिग बी अमिताभ बच्चन यांचा आलिशान बंगला असो, त्याचप्रमाणे आता आणखी एका अभिनेत्याच्या बंगला विषयी चर्चा सुरू आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी हे बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे नाव असून प्रत्येक भूमिका तो उत्तमपणे साकारतो. त्यामुळे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी तो एक मानला जातो. आपली कार्य क्षमता सिद्ध करणाऱ्या नवाजुद्दीनची अभिनयाची आवड कोणापासून लपलेली नाही.
त्याच्या कामावर जितके प्रेम आहे, तितकेच त्याचे कुटुंबावरही प्रेम आहे. त्याचा मोठा पुरावा म्हणजे त्याचा मुंबईत बांधलेला आलिशान बंगला होय! या अभिनेत्याने नुकतेच मुंबईत आपले मोठे घर बनवले असून त्याने ते आपल्या वडिलांना समर्पित केले आहे. वडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी आपल्या बंगल्याचे नाव ‘नवाब’ ठेवले. या अभिनेत्याच्या बंगल्याच्या बांधकामाला तीन वर्षे लागली आहेत. या बंगल्याच्या इंटिरिअरपासून रंगापर्यंत त्यांनी स्वत: निर्णय घेतला आहे. आपल्या गावात बांधलेल्या जुन्या घरापासून प्रेरणा घेऊन त्यांनी हा बंगला बांधल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा पांढऱ्या रंगाचा बंगला अतिशय सुंदर आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकीला नुकतेच सुधीर मिश्रा यांच्या सीरिअस मेन या मालिकेतील अभिनयासाठी आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते. त्यानंतर तो कंगना राणौत निर्मित ‘टिकू वेड्स शेरू’मध्ये काम करत आहे. हा चित्रपट साई कबीर यांच्या दिग्दर्शनाखाली बनला आहे. याशिवाय, आगामी काळात तो टायगर श्रॉफ सोबत तो हिरोपंती 2 मध्ये देखील दिसणार आहे, या चित्रपटातील त्याची भूमिका वेगळी असेल. नवाजुद्दीन सर्वसामान्य जीवन जगण्यास प्राधान्य देतो, दीर्घकाळ काम केल्यानंतरही नवाज लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करतो. यामागचे कारण खुद्द अभिनेत्याने एका मुलाखतीत सांगितले. त्याला स्टारडम आणि ग्लॅमरची दुनिया आवडत नाही, असे तो म्हणाला होता. चित्रपटसृष्टीतील कार्यक्रम किंवा पार्ट्यांमध्ये जाण्यापेक्षा त्याला सर्वसामान्य लोकांमध्ये राहणे आवडते.
आपल्या संघर्षाच्या दिवसांची आठवण करून देताना नवाजने सांगितले की, तो एका पेट्रोकेमिकल कारखान्यात काम करत असे. तेव्हा त्याला महिन्याला दोन हजार रुपये मिळायचे. त्याआधी त्याच्या आईने त्याच्या परिक्षा फी व अभ्यासासाठी तिचे दागिने गहाण ठेवले होते. ते परत आणण्यासाठी त्याने एक वेळ उपाशी राहून त्याचा दोन महिन्यांचा पगार जमा केला होता. त्यानंतर तो ४ हजार रुपये घेऊन गावी गेला आणि पैसे दिल्यानंतर त्याने आईचे दागिने परत घेतले.