इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अनेक मालिका आणि चित्रपटात आपल्या भूमिका उत्तमरित्या साकारणारा तसेच स्पष्टवक्तेपणा असलेला अभिनेता म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत आस्ताद काळेचे नाव घेतले जाते. आस्ताद हा त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे कायम चर्चेत असतो. ‘बिग बॉस मराठी’मध्ये देखील स्वतःची तत्त्वे, मूल्ये त्याने जराही सोडली नाहीत. तिथेही त्याने त्याचा स्पष्टवक्तेपणा कायम ठेवला. तोंडावर एक आणि मनात एक असा आस्तादचा स्वभाव नसल्याने त्याने एका वाहिनीबाबत केलेल्या रोखठोक विधानामुळे तो चर्चेत आला आहे.
आस्ताद काळे हा सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो. तो नेहमी विविध पोस्ट शेअर करताना दिसतो. गणेश विसर्जनावेळी त्याने ढोल पथकाचे फोटो शेअर केले. तर आस्तादने नुकतीच एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एका प्रसिद्ध मराठी वाहिनीवरील मालिकेबद्दल स्पष्ट मत मांडले आहे. यात त्याने एका अभिनेत्याच्या अभिनयाबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. या पोस्टनुसार ‘झी मराठी’वरील एका मालिकेतील एका नटाने साकारलेल्या पात्राच्या वाक्यांपुरती सबटायटल्सची सोय करा बुवा. काय बोलतो कळत नाही. ता.क:- मी ती मालिका बघत नाही. काल माझ्या आईनी लावली होती, तेव्हा तीमधले एक-दोन प्रसंग भोगले’, असे आस्ताद काळने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आस्ताद काळेच्या या पोस्टवर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहे. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत ती मालिका कोणती हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर काहींनी आस्तादच्या या पोस्टवर सहमती दर्शवली आहे. नेटकऱ्यांच्या कमेंटनुसार, आस्तादची ही पोस्ट ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेसंदर्भात आहे. ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका सुरू झाल्यापासून अनामिकाचा नवरा आकाशचा सातत्याने उल्लेख झाल्याचे पाहायला मिळत होते. त्यानंतर आता त्याची या मालिकेत एंट्री झाली आहे.
या मालिकेत आकाशची भूमिका अभिनेता अशोक समर्थ साकारताना दिसत आहे. त्याच्या अभिनयावर प्रेक्षकांनी टीका केली आहे. त्याचे संवाद ऐकायलाच येत नसल्याच्या तक्रारीही प्रेक्षक करताना दिसत आहेत. एका युझरने तर ज्या दिवशी तो कलाकार तोंड उघडून डायलॉग म्हणेल तो दिवस ऐतिहासिक असेल, असे म्हटले आहे. पट्ट्याने मारेस्तोवर मार खाताना संवाद बोलणारा एकमेव कलाकार असे म्हटले. तर आस्तादने त्यावर पट्ट्याचा कलाकार अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Actor Astad Kale on Zee Marathi Serial