मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय क्रिकेट संघाचा फटकेबाज फलंदाज ऋषभ पंत याच्या अपघातामुळे त्याच्या करियरबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. अलीकडेच डॉक्टरांनी त्याला किमान अर्धे वर्ष बिछान्यावर काढावे लागेल, असे स्पष्ट केले आहे. अर्थात व्यायाम आणि औषधांच्या पलीकडे त्याचं दुसरं विश्व नसणार आहे, असाच त्याचा अर्थ आहे.
सरत्या वर्षाच्या अखेरीस ऋषभ पंतचा जोरदार अपघात झाल्याचं कानावर पडलं आणि क्रिकेटप्रेमींच्या मनात धस्स झालं. थोडक्यात निभावल्यामुळे ऋषभचे प्राण वाचले. पण आता त्याला बरेच दिवस क्रिकेटला मुकावे लागणार आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे आणि दुखापत सुद्धा गंभीर नाही. ज्या जखमा झालेल्या आहेत, त्याही गंभीर नाहीत, पण फॉर्मात असलेल्या क्रिकेटपटूसाठी कुठलीही छोटी दुखापत सुद्धा चिंताजनक असते. ऋषभ पंतच्या बाबतीत तसेच झाले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आणखी सात महिने ऋषभला आराम करावा लागणार आहे. त्यानंतरही तो हळूहळू सराव सुरू करेल आणि त्यामुळे पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येण्यासाठी त्याला एक वर्ष लागू शकतं, असा अंदाज क्रिकेटतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया यांच्या विरुद्धच्या मालिका आणि आयपीएलच्या अख्ख्या हंगामाला तो मुकणार आहे, हे तर निश्चित झाले आहे. पण वर्षाअखेरीस होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतही ऋषप पंतची फटकेबाजी बघायला मिळणार की नाही, याबाबत शंका व्यक्त होत आहे. एकूणच ऋषभचे अख्खे वर्ष वाया जाणार, असे चित्र सध्या आहे. कारण त्याच्या जखमा बऱ्या झाल्या तरी फिटनेस सिद्ध करणे आणि पुन्हा सराव सुरू करणे, ही मोठी प्रक्रिया त्याला पार पाडायची आहे.
क्रिकेटमध्ये फिटनेसला मोठं महत्त्वं आहे. हातापायाला दुखापत असेल तर मग मोठ्या स्पर्धांसाठी संघात विचारही केला जात नाही. ऋषभच्या हाताला, मनगटाला, गुडघ्याला बऱ्यापैकी दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्या क्रिकेट खेळण्यावर, फिटनेसवर चांगल्याच मर्यादा असणार आहेत. कदाचित आठ महिन्यांनी पुन्हा एकदा तो कमबॅक करून दमदार कामगिरी करेल, पण त्यासाठी त्याला आणि क्रिकेटप्रेमींना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Road Accident Indian Cricketer Rishabh Pant Health Recovery
Sports Doctor Experts