नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वयोमानानुसार माणसाची स्मरणशक्ती कमी होते. परंतु एखाद्या कोरोना आजारामुळे काही आठवत नाही असे अद्याप वैद्यकीयदृष्ट्या स्पष्ट झालेले नाही, तरीही एका आरोग्य मंत्र्यानेच ईडीच्या चौकशी अधिकाऱ्यासमोर असा खुलासा केल्याने अधिकारी देखील चक्रावले आहेत.
नवी दिल्ली राज्याचे आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मंत्री संत्येंद्र जैन यांनी असा विचित्र दावा केला आहे. कोरोनामुळे आपली स्मरणशक्ती गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. ईडीने मनी लाँड्रींगची कारवाई केल्यानंतर काही दस्तावेज दाखवून त्यांची विचारपूस केली होती. त्यावेळी, ईडीतील अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना जैन यांनी हा दावा केला आहे. जैन यांच्या याचिकेवरील सुनावणीवेळी ईडीने न्यायालयात ही आश्चर्यकारक माहिती दिली.
मनी लाँड्रीगप्रकरणी ईडीने आपचे मंत्री सत्येंद्र जैन यांना ३० मे रोजी अटक केली. नंतर त्यांना ९ जूनपयर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. कोठडी संपत असल्याने त्यांना गुरुवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी ईडीने त्यांची कोठडी वाढविण्याची मागणी केली होती.
जैन यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी दावा केला की कोठडी वाढवून देण्याची गरज नाही. आता, याप्रकरणी सत्येंद्र यांच्या बाजूने वरिष्ठ अधिवक्ता हरिहरन यांनी बाजू मांडली. तर, सरकारच्यावतीने एडिशनल सॉलिटर जनरल एसबी राजू यांनी जैन यांच्या जामिन याचिकेवर बाजू मांडली.
न्यायमूर्ती गीतांजली गोयल यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून निर्णय राखून ठेवला आहे. तर दुसरीकडे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी सांगितले की, दिल्ली आणि गुरुग्राम येथे ईडीने जैन यांच्या ७ ठिकाणांवर छापे मारले होते. त्यातून सुमारे २.८२ कोटी रोख आणि १.८ किलो सोने जप्त करण्यात आले होते. याबाबत जैन यांची चौकशी करण्यात येणार असल्याने कोठडी वाढवून मिळावी. दरम्यान जैन यांच्या या अजब आणि वादग्रस्त वक्तव्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.