नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लक्षण नसलेल्या आणि सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यानुसार, कोरोनाची बाधा झाल्यानंतर अहवाल निगेटिव्ह आल्यास, आता पूर्ण कुटुंबाची तपासणी करणे आवश्यक नाही. अशा रुग्णांनी सात दिवसांपर्यंत विलगीकरणात राहून स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
तुम्हाला कधी रुग्णालयात जाण्याची गरज भासेल, कशा प्रकारे तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि कुटुंबीयांनी कसा आपला बचाव करायचा आहे, याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. विनालक्षण म्हणजे असे रुग्ण ज्यांना कोणतेही लक्षणे दिसून येत नाहीयेत.
ज्यांचा तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असेल, ज्या रुग्णांना सौम्य ताप, खोकला किंवा अशक्तपणा जाणवत असेल, अशा रुग्णांना सौम्य रुग्णांच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. मात्र या श्रेणीत रुग्णाचे वय काय आहे हे लक्षात घ्यावे लागणार आहे. त्याला आधी कोणता आजार तर नाही? जर दुसरे आजार असतील, तर कोणती औषधे घेत आहेत? या प्रश्नांची उत्तरे वैद्यकीय सल्ला घेतल्यानंतरच मिळेल.
येथे मिळेल पूर्ण माहिती
मंत्रालयाच्या http://mohfw.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला गृहविलगीकरणाशी संबंधित माहिती आणि हेल्पलाइन नंबर मिळू शकणार आहे.
नवे दिशानिर्देश कोणते
– जर अँटिजन किंवा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटिव्ह आला असेल, परंतु रुग्णाची ऑक्सिजन पातळी ९३ टक्क्यांहून अधिक आहे, किंवा रुग्णाला ताप नाही, किंवा श्वास घेण्यास त्रास होत नाही.नाही, तर गृहविलगीकरणात राहू शकतात. अशा रुग्णासह त्याच्या कुटुंबीयांनी विलगीकरणात रहावे.
– रुग्णाच्या विलगीकरणाची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असेल. रुग्ण आणि त्याच्या कुटुंबीयांना एक फोन नंबर देणे आवश्यक आहे. गरज पडल्यास २४ तासात कधीही मदत करता येऊ शकेल.
– रुग्णाची देखभाल करणार्या व्यक्तीने लशीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. रुग्णाच्या चेहर्यावर तीन लेअरचा मास्क असणे आवश्यक आहे. रुग्णाची २४ तास देखभाल करणारी व्यक्ती असणे आवश्यक आहे. इतर सदस्यांनी विलगीकरणात राहून आपल्या लक्षणांवर लक्ष ठेवावे.
– घरातील ज्येष्ठ नागरिकांची देखभाल करणे आवश्यक आहे.
रुग्णापासून कुटुंबीयांनी दूर रहावे
– ज्या खोलीत रुग्ण विलगीकरणात आहे, त्या घरातील इतर सदस्यांनी वेगळे रहाणे आवश्यक आहे. रुग्णाला एका हवा खेळती असलेल्या खोलीत ठेवावे. खोलीतील खिडक्या उघड्या असायला हव्यात.
– रुग्णाने भरपूर आराम करणे आवश्यक आहे. द्रव्य पदार्थांचे सेवन केले पाहिजे. कमीत कमी ४० सेकंद साबण आणि पाण्याने सारखे हात धुतले पाहिजे. घरातील इतर सदस्यांनी रुग्णांचे भांडे वापरू नये.
– खोलीत सारखा स्पर्श होणारे पृष्ठभाग जसे टेबलटॉप, दार, नळ, हँडल या वस्तूंची साबणाने स्वच्छता करणे आवश्यक आहे. रुग्णांच्या कोरोना लक्षणांवर बारीक लक्ष ठेवणे आवश्यक आहे. कोणतीही लक्षणे गंभीर झाल्यास त्वरित रिपोर्ट करायला पाहिजे.
डॉक्टरांच्या संपर्कात रहावे
– रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये. डॉक्टरांच्या संपर्कात रहावे.
– रुग्णांना १०० डिग्री ताप, श्वास घेण्यास त्रास होत असेल, ऑक्सिजनची पातळी घसरली असेल, छातीत दुखत असेल आणि गंभीर थकवा जाणवत असेल तर तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे.
विलगणीकरणानंतर तपासणीची गरज नाही
सात दिवस राहिल्यानंतर आणि गेले तीन दिवस ताप नसेल तर रुग्णाने विलगीकरण संपवावे. परंतु त्यानंतर रुग्णांना मास्क घालणे आवश्यक आहे. गृहविलगीकरणाचा काळ संपल्यानंतर पुन्हा तपासणी करण्याची आवश्यकता नाही.