मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नोकरी शोधणार्या युवकांसाठी एक चांगली बातमी आहे. आयटी सेक्टरमध्ये या वर्षी हायरिंग अॅक्टिव्हिटीमध्ये (Hiring activity) नोकर्यांची संधी निर्माण झाली आहे. इन्फोसिसपासून विप्रोपर्यंतच्या दिग्गज आयटी कंपन्या फ्रेशर्सना संधी देणार आहेत. डिसेंबर २०२१ च्या अंतिम तिमाहीचे निकाल घोषित करताना इन्फोसिस आणि विप्रो या आयटी कंपन्यांनी हायरिंगबद्दल घोषणा केली होती. दोन्ही कंपन्यांनी तीन महिन्यांच्या काळात एकूण २६,००० युवकांना नोकरी दिली आहे.
विप्रो
विप्रोने पुढील वर्षापर्यंत ३० हजार फ्रेशर्सना नियुक्त करण्याची योजना आखली आहे. कारण नोकरी सोडणार्या नागरिकांची संख्या वाढून २२ टक्के झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२२ या आर्थिक वर्षात कंपनी ७० टक्क्यांहून अधिक फ्रेशर्सची नियुक्ती करणार आहे. गेल्या एका वर्षात भारतीय आयटी कंपन्यांमध्ये नोकरी सोडून जाणार्या कर्मचार्यांची वाढ झाली आहे. नोकरी सोडल्यामुळे कर्मचार्यांचा खर्च अधिक असतो आणि मार्जिन कमी असते. भारतातील बहुतांश सर्व आयटी कंपन्यांमध्ये हीच समस्या पाहिली जात आहे. विप्रोमध्ये कंपनी सोडून जाणार्या कर्मचार्यांची डिसेंबरच्या तिमाहीतील संख्या सर्वाधिक होती. विप्रोमध्ये गेल्या तिमाहीत १०,३०६ कर्मचार्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे विप्रोतील कर्मचारी संख्या २,३१,६७१ इतकी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ४१,३६३ ने वाढ झाली आहे.
इन्फोसिस
डिसेंबर २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीचे उत्पन्नाची घोषणा करताना इन्फोसिस या भारताच्या दुसर्या मोठ्या आयटी कंपनीने सांगितले, की २०२२ या आर्थिक वर्षासाठी कंपनीकडून ५५ हजारांहून अधिक फ्रेशर्सची नियुक्ती करण्यात येणार आहे. कंपनीचे मुख्य आर्थिक अधिकारी (सीएफओ) निलांजन रॉल म्हणाले, आम्ही टॅलेंटच्या शोधात आहोत, आमच्या ग्लोबल हायरिंग प्रोग्रॅमअंतर्गत २०२२ या आर्थिक वर्षात ५५ हजारांहून अधिक भरती करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. डिसेंबर २०२१ पर्यंत इन्फोसिसमध्ये एकूण कर्मचार्यांची संख्या २,९२,०६७ होती. गेल्या तिमाहीत ती २,७९,६१७ आणि डिसेंबर २०२० पर्यंत २,४९,३१२ होती.
टीसीएस
टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)ने कर्मचार्यांची नुकतीच पाच लाखांची संख्या पार केली आहे. कंपनीकडून टेक्नोलॉजी टॅलेंटचा शोध घेतला जात आहे. मार्चपर्यंत ३४ हजार अतिरिक्त फ्रेशर्सची नियुक्ती करण्याची कंपनीची योजना होती. डिसेंबरलाच कंपनीचे हे लक्ष्य पूर्ण झाले आहे. आगामी महिन्यांमध्ये आणखी नियुक्त्या करणार असल्याचे टीसीएस व्यवस्थापनाने सांगितले आहे. डिसेंबर २०२१ ला समाप्त झालेल्या तिमाहीत टीसीएसचे १५.३ टक्के कर्मचार्यांनी नोकरी सोडली होती. ही विप्रो (२२.७ टक्के) आणि इन्फोसिस (२५ टक्के) च्या तुलनेत सर्वात कमी संख्या आहे. कंपनीने गेल्या तीन महिन्यात २८ हजार नव्या कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे.