नवी दिल्ली – सुट्टीच्या काळात सैनिकांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत संरक्षण मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. सुट्टीवर गेलेल्या कोणत्याही सैनिकावर मूलतत्ववादी किंवा असामाजिक तत्वांनी हल्ला केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला तर तो मृत्यू ड्युटीवर झाल्याचे मानले जाणार आहे. त्यानुसारच त्यांना भरपाईची रक्कम प्रदान केली जाणार आहे. लष्कराच्या तिन्ही दलांना हा आदेश लागू करण्यात आला आहे.
नुकत्याच जारी करण्यात आलेल्या या आदेशात म्हटले आहे की, अशा प्रकरणात अनेक मुद्यांवर परिस्थिती स्पष्ट झालेली नव्हती. एखादा सैनिक सुट्टीवर घरी आला असेल. किंवा इतर ठिकाणी गेला असेल. यादरम्यान मूलतत्त्ववादी किंवा असामाजिक तत्वांच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्यास त्यांचा मृत्यू ड्युटीवर झाल्याचे मानले जाईल. सैनिकांना दिल्या जाणार्या सर्व सुट्ट्यांचा यात समावेश आहे.
गेल्या काही दिवसांपासून सैनिकांवरील हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. त्यातही सुट्टीवर असलेल्या सैनिकांवर मोठ्या प्रमाणात हल्ले वाढले होते. अशा घटना काश्मीरमध्ये जास्त घडल्या. अशा घटनांबाबत सरकारने खुलासा करून सैनिकांना दिलासा दिला आहे. ते सैनिक आहेत म्हणून त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे त्यांना हा लाभ मिळायलाच हवा, असा तर्क संरक्षण मंत्रालयाने मांडला आहे.
तर लाभ नाही
दरम्यान, सुट्टी दरम्यान घरी आलेल्या सैनिकावर वैयक्तिक वैर असल्यामुळे हल्ला झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला तर तो मृत्यू ड्युटीवर झाल्याचे मानले जाणार नाही. त्यामुळे ड्युटीवर असलेल्या मृत सैनिकांप्रमाणे त्यांना कोणतीही भरपाई देण्यात येणार नाही, असेही संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.