नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदावर असताना अंबानी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एका व्यक्तीची फाइल मंजूर करण्यासाठी ३०० कोटी रुपयांची लाच स्वीकारण्याची ऑफर देण्यात आली होती, असा खळबळजनक दावा जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे. त्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराशी कोणतीच तडजोड करू नका असे सांगत पाठिंबा दिला होता, अशी स्तुतीही त्यांनी केली.
राजस्थानमधील झुंझुनूमध्ये सत्यपाल मलिक म्हणाले, की काश्मीरला गेल्यानंतर माझ्याकडे दोन फाइल आल्या. एक फाइल अंबानी यांची होती आणि दुसरी आरएसएसशी संबंधित एका व्यक्तीची होती. ही व्यक्ती गेल्या मेहबूबा मुफ्ती आणि भाजप सरकारमधील माजी मंत्री होती. तसेच ती व्यक्ती पंतप्रधान मोदी यांचीही निकटवर्तीय होती.
या फाइलमध्ये घोटाळा असून दोन्ही फाइलसाठी प्रत्येकी १५० कोटी रुपये दिले जाणार आहेत, अशी सूचना माझ्या सचिवांनी दिली. त्यानंतर मी एकानंतर एक दोन्ही डील रद्द केले. मी पाच सलवार-कुर्ते घेऊन आलो आहे, आणि त्यासोबतच परत जाणार आहे, असे सत्यपाल मलिक यांनी सांगितले. सत्यपाल मलिक यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या दोन्ही फाइलबाबत सत्यपाल मलिक यांनी सविस्तर माहिती दिली नाही. परंतु सरकारी कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक आणि पत्रकारांसाठीच्या एका ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीशी संबंधित फाइलबाबत ते बोलत होते. त्यासाठी सरकारने अनिल अंबानी यांच्या रिलायन्स जनरल इन्शुरन्ससोबत करार केला होता, असे बोलले जात आहे.
सावधगिरी म्हणून मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मागून या दोन्ही फाइलबद्दल सांगितले होते. यामध्ये सहभागी लोक त्यांचे नाव घेत आहेत, हेसुद्धा त्यांना सांगितले होते. मी पद सोडायला तयार आहे, पण मी या फायलींना मंजुरी देणार नाही, असे त्यांनी तेव्हा सांगितले होते. पंतप्रधान मोदी यांनी माझे कौतुक केले आणि भ्रष्टाचाराशी तडजोड करू नये, असे सांगितल्याचा दावा सत्यपाल मलिक यांनी केला आहे.
ऑक्टोबर २०१८ मध्ये सत्यपाल मलिक जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल होते. तेव्हा त्यांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आल्याने रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीसोबतची डील रद्द केली होती. त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दोन दिवसांनंतर या डीलमध्ये भ्रष्टाचार झाला आहे का? हे पाहण्याच्या सूचना केल्या होत्या.