नाशिक : बहुचर्चित खूनाच्या गुह्यात टाडा अन्वये जन्मठेपेची शिक्षा भोगत असतांना संचित रजा घेवून कारागृहातून पसार झालेल्या कैद्यास शहर पोलीसांनी गुजरात राज्यात बेड्या ठोकल्या. संशयीत तब्बल २३ वर्षापासून बेपत्ता होता. वेश आणि नाव बदलून तो वेगवेगळया भागात राहत होता. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने केली.
रविंद्र मोगल पांडे असे अटक करण्यात आलेल्या कैद्याचे नाव आहे. बहुचर्चित वैभव कट्यारे हत्याकांडातील तो आरोपी आहे. १५ सप्टेंबर १९९२ रोजी नाशिकरोड येथील व्यापारी कांतीलाल कटारे यांचा नातू वैभव कटारे यांचे बिरजू गिज आणि रविंद्र पांडे गँगने अपहरण केले होते. २० लाखाच्या खंडणीसाठी बिटको हॉस्पिटल समोरून वैभव कट्यारे यास उचलण्यात आले होते. वेळीच रोकड हाती न पडल्याने खंडणीखोरांच्या मारहाणीत वैभवचा मृत्यु झाला होता. याप्रकरणी खूनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या बहुचर्चित घटनेचे सर्वत्र पडसात उमटल्याने या गुह्यात टाडा अॅक्ट लावण्यात आला होता. या खटल्यात न्यायालयाने टाडा अन्वये पाच जणांच्या टोळक्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले होते. त्यामुळे आरोपी कारागृहातच होते. नाशिकरोड कारागृहात असतांना १८ फेब्रुवारी १९९८ रोजी रविंद्र पांडे चौदा दिवसांची संचित रजा घेवून बाहेर पडला होता. रजेचा कालावधी उलटण्यापूर्वी त्याने पुन्हा कारागृहात येणे अपेक्षीत असतांना तो पसार झाला होता. याप्रकरणी देवळील कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल २३ वर्षापासून तो फरार होता. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी नुकतीच फरार बंदींची शोध मोहिम हाती घेतल्याने आरोपी हाती लागला आहे.
युनिटचे कर्मचारी शामराव भोसले यांना मिळालेल्या माहितीमुळे तो पोलीसांच्या जाळयात अडकला आहे. रविंद्र पांडे हा गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरात नाव बदलून राहत असल्याची माहिती मिळाल्याने युनिटचे निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक श्रीराम पवार,सहाय्यक उपनिरीक्षक शामराव भोसले,हवालदार शंकर काळे व पोलीस नाईक नंदकुमार नांदुर्डीकर आदींचे पथक रवाना झाले होते. सलग दोन दिवस अहमदाबाद जिह्यातील दशकोळी तालूक्यात पोलीस तळ ठोकून होते. पांडे हा नाव बदलून राहत असल्याने त्याचा कुठलाही ठाव ठिकाणा लागत नव्हता. मात्र पोलीसांनी फोटो व माहितीच्या आधारे त्यास कुआ ता. दशकोळी या गावात बेड्या ठोकल्या. राजूभाई रामदास जाधव उर्फ फौजी नावाने तो या गावात वावरत होता. प्रारंभी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली परंतू त्यास खाक्या दाखविताच त्याने रविंद्र पांडे असल्याची कबुली दिली. पथकाने त्यास देवळाली कॅम्प पोलीसांच्या स्वाधिन केले आहे.