नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वडाळागावातील एका घरातील आणि ट्रव्हल्स बसच्या माध्यमातून मुंबईच्या दिशेने वाहतूक केला जाणारा ७० किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. इंदिरानगर व मुंबई नाका पोलिसांच्या स्वतंत्र कारवाईत हा गांजा हस्तगत करण्यात आला. या कारवाईत सुमारे सव्वा सात लाखांचा मुद्देमाल जप्त करून सहा संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
वडाळा गावातील मेहबूबनगरमध्ये अमली पदार्थांचा साठा केल्याची माहिती इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गणेश न्यायदे यांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी (दि.३०) कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान ही कारवाई करण्यात आली. निरीक्षक न्यायदे यांच्यासह उपनिरीक्षक सुवासिनी बारेला, लक्ष्मण बोराडे, सागर परदेशी, योगेश जाधव, युवराज पाटील, अमजद पटेल, वसंत ढगे आदींच्या पथकाने वडाळागावातील मेहबूबनगरमध्ये छापा टाकला. या कारवाईत बंद घराचे कुलूप तोडून पथकाने सुमारे एक लाख दोन हजार रूपये किमतीचा आठ किलो ५०० ग्रॅम गांजा हस्तगत केला.
या प्रकरणी संशयित इम्तियाज उमर शेख (वय ३०) याच्यावर अमली पदार्थ प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस नाईक सागर परदेशी यांच्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक बारेला करीत आहेत. या परिसरासह नाशिकच्या इतर भागातही गांजा व अमली पदार्थांचा साठा असण्याची शक्यता आहे. त्यानुसार गुन्हे शाखेला शोध घेत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दुसरी कारवाई मुंबईनाका भागातील मायलन सर्कल भागात करण्यात आली. मायलन सर्कलजवळ उभ्या असलेल्या एका ट्रॅव्हल्स बसमधून गांजाची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मुंबई नाका पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत अहिरे यांना मिळाली. त्यानुसार रविवारी (दि.३०) पथकाने धाव घेत ट्रॅव्हल्सबसची तपासणी केली असता बसच्या पाठीमागील डिक्कीत सुमारे सहा लाख २५ हजार ६०० रूपये किमतीचा ६२ किलो गांजा हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणी संशयित रोहित सुधाकर तुपे (वय २६), संतोष महादेव भुरे (२८, दोघे रा. मालाड) यांच्यासह आकाश (२२), श्रवण (२५) आणि अक्षय (२८) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तुपे व भुरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तस्करीच्या उद्देशाने ट्रॅव्हल्समधून हा गांजा नाशिकमार्गे मुंबईला नेला जात असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. या दोन्ही मोठ्या कारवायांमुळे नाशिकमधील अमली पदार्थांचा सुळसुळाट अधोरेखित झाला आहे.