मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विमानातील विचित्र घटना कायमच चर्चेत असतात. विशेषतः एअरलाईन्सच्या चुकांमुळे किंवा गोंधळलेल्या व्यवस्थापनामुळे घडणाऱ्या घटना तर विशेषत्वाने चर्चेत असतात. आता मात्र इंडियो कंपनीने कहरच केला. कंपनीच्या एका शेड्युल्ड फ्लाईटसाठी प्रवासी पोहोचले तरीही पायलटच गायब होता. त्यामुळे तब्बल ८ तास उशिराने टेक-ऑफ झाले.
२७ एप्रिलला रात्री ८ वाजून १० मिनिटांनी मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाने (६ई-२५१८) आठ तासांनी उड्डाण केले. विशेष म्हणजे प्रवासी अगदी वेळेत एअरपोर्टला पोहोचले होते. चेक-इन झाले होते. पण, विमानात बोर्डींग झाले नव्हते. पहिले दोन तास तर प्रवासीच व्यवस्थापनाला उशीर होण्याचे कारण विचारत होते. मात्र समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने प्रवासी संतापले.
अखेर तीन तासांनंतर व्यवस्थापनाने खरे कारण सांगितले. त्यावेळी कळले की फ्लाईट रेडी असले तरीही पायलटच जागेवर नाही. पायलट गायब असल्यामुळे फ्लाईट टेक-ऑफ करणे शक्य नव्हते. अश्यात प्रवाशांचे हाल झाले. एकतर सुरुवातीला विमानासंदर्भात कुठलीही माहिती दिली गेली नाही. आणि त्यानंतर एवढ्या विचित्र कारणांनी ताटकळत बसावे लागले. त्यामुळे प्रवाश्यांनी इंडिगो व्यवस्थापनाला चांगलेच धारेवर धरले.
पहाटे उडाले विमान
प्रवाश्यांना ताटकळत राहावे लागल्याने व्यवस्थापनाने दिलगिरी व्यक्त केली. सर्व प्रवाश्यांची खानपानाची व्यवस्था करण्यात आली. आणि २८ एप्रिलला पहाटे ४ वाजता विमानाने टेक-ऑफ केले.
खरे कारण वेगळेच
मुळात मुंबईतच येताना खराब हवामानामुळे विमानाला उशीर झाला. त्यानंतर पुढील उड्डाणासाठी प्रशासकीय व्यवस्था आणि केबिन क्रुची व्यवस्था करणे यामुळे अधिकच विलंब झाला. त्यानंतर प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून कंपनीने वेगवेगळ्या व्यवस्था केल्या.
Mumbai Airport Indigo Flight Chaos Passenger Pilot