इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
ते अधिक आनंदी असतात
जोपर्यंत आपण परमेश्वराचे पाईक आहोत तोपर्यंत आपण कोण आहोत व कोठे उभे राहून आपल्याला लढण्याचे काम दिले गेले आहे या गोष्टीला महत्त्व नाही. देवकार्यांत, सेवाकार्यांत पराक्रमानें पुढेपुढे जाण्यासाठी ज्यांच्यासमोर विस्तृत मैदान असते व अंगी पुरेशी शक्तिही असते ते अधिक आनंदी असतात. तसेच आपापल्या झोपड्यांच्या सावलीत राहून व अरुंद वाटेने पुढे पुढे जात ज्यांना कर्तव्यपालनाचे व्रत चालवावयाचे असते तेही काही कमी आनंदी नसतात. प्रेमदान करण्याचे भाग्य लाभल्यावर इतर सर्व गोष्टी कमी महत्त्वाच्या होऊन जातात. मनुष्य शहाणा वा अजाण असो, समर्थ वा असमर्थ असो, जगासमोर झगझगीत प्रकाशात अथवा अंधाऱ्या गुहात तो काम करीत असो; त्याला महत्त्व नाही. या सर्व अवस्थात, ‘आपण परमेश्वराचे पाईक आहोत’ ही सतत जाणीव असली म्हणजे त्यात सर्व काही आले.