नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशात विविध जीवघेण्या आजारांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढते आहे. त्यामुळे मानवी आरोग्यासह मृत्यूदरावरही परिणाम होत आहे. यासंदर्भात जीवघेण्या आजारांचे लवकर निदान झाले तर संबंधितांना उपचार मिळू शकतील. त्यादृष्टीने केंद्र सरकार काय प्रयत्न करीत आहे, असा प्रश्न संसदेत विचारण्यात आला. त्याला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी उत्तर दिले.
डॉ. पवार म्हणाल्या की, राष्ट्रीय आरोग्य अभियाना (एनएचएम) अंतर्गत कर्करोग, मधुमेह, हृदयरोग आणि पक्षाघाताच्या (एनपीसीडीसीएस) प्रतिबंध तसेच नियंत्रणासाठी, राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना, त्यांनी दिलेल्या प्रस्तावांच्या आधारावर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य पुरवतो.
कर्करोग हा एनपीसीडीसीएसचा अविभाज्य भाग आहे. कर्करोगासह असंसर्गजन्य रोगांच्या (एनसीडी) उपचारांसाठी,पायाभूत सुविधा मजबूत करणे, मनुष्यबळ विकास, आरोग्य प्रोत्साहन आणि जनजागृती, तपासणी, लवकर निदान, व्यवस्थापन आणि योग्य स्तरावरील आरोग्य सेवा सुविधेकडे पाठवणे यावर हा कार्यक्रम लक्ष केंद्रित करतो. एनपीसीडीसीएस अंतर्गत, 707 जिल्हा एनसीडी आरोग्य केन्द्र, 193 जिल्हा हृदयरोग आरोग्य केन्द्र, 268 डे केअर आणि 5541 सामुदायिक आरोग्य केंद्र एनसीडी केन्द्रांची स्थापना करण्यात आली आहे.
एनएचएम अंतर्गत, व्यापक प्राथमिक आरोग्य सेवेचा भाग म्हणून, सामान्य एनसीडी म्हणजेच मधुमेह, उच्च रक्तदाब आणि सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या कर्करोगाच्या प्रतिबंध, नियंत्रण आणि तपासणीसाठी लोकसंख्या-आधारित उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमांतर्गत, 30 वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींच्या तपासणीवर लक्ष केन्द्रित केले आहे. या तपासणीत तोंडाचा, स्तनाचा आणि गर्भाशयाचा या तीन कर्करोगांचा समावेश आहे. आयुष्मान भारत – आरोग्य आणि कल्याण केंद्रांअंतर्गत या कर्करोगांची तपासणी हा आरोग्य सेवेचा अविभाज्य भाग आहे.
आयुष्मान भारत- आरोग्य आणि कल्याण केन्द्रां अंतर्गत (एबी-एचडब्लूसी), प्राथमिक आरोग्य सेवांचा समावेश आहे. त्यात निवडक ते व्यापक प्राथमिक आरोग्य सेवा (सीपीएचसी) समाविष्ट असून एनसीडी सेवांचाही समावेश आहे. ही केन्द्र समुदायाच्या जवळ आहेत.
आयुष्मान भारत- आरोग्य आणि कल्याण केन्द्र योजनेच्या माध्यमातून सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवेअंतर्गत, कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारांच्या प्रतिबंधात्मक पैलूला, कल्याणकारी कामांना प्रोत्साहन देऊन आणि समुदाय स्तरावर लक्ष्यित संवाद साधून बळकटी दिली जात आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
Minister Bharti Pawar on Serious Diseases Diagnosis Efforts