नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिर्डी ते नागपूर समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाल्यापासून तब्बल २९ रस्ते अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात एकाचा मृत्यू तर ३३ जण जखमी झाले आहेत. ११ ते २० डिसेंबर या कालावधीत हे सगळे अपघात घडले असून, विविध वाहतूक नियमांचे उल्लंघनही या महामार्गावर होत असल्याचे दिसून येत आहे.
नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन झाले आणि ११ डिसेंबरपासून हा महामार्ग सुरू झाला. दर्जेदार रस्त्यामुळे या दोन शहरांमधील अंतरही पाच तासात पूर्ण करता येऊ लागले. महामार्गावर अवजड वाहनांसाठी प्रतितास ८० किलोमीटर आणि हलक्या वाहनांसाठी प्रतितास १२० किलोमीटरची वेगमर्यादा देण्यात आली आहे. मात्र पहिल्या तीन दिवसांत दोन रस्ते अपघात झाले होते. वेगमर्यादेचे उल्लंघन करून बेदरकारपणे वाहन चालविणे, अन्य वाहनांना नियमाचे उल्लंघन करून मागे टाकणे या काही कारणांमुळे महामार्गावर अपघात होत आहेत.
११ ते २० डिसेंबर या कालावधीत एकूण २९ अपघात झाल्याची माहिती महामार्ग वाहतूक पोलिसांनी दिली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर १२ जणांना गंभीर दुखापत झाली आहे. तर २१ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात नऊ आणि जालना जिल्ह्यात आठ अपघातांची नोंद झाली आहे. नियंत्रण ठेवण्यात राज्य शासनाला अपयशच आले आहे. यापैकी वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याची सर्वाधिक म्हणजे ६७ प्रकरणे आतापर्यंत दाखल झाली आहेत.
मागील दहा दिवसांत झालेल्या नियम उल्लंघनाच्या एकूण प्रकरणांपैकी ६७ प्रकरणे वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याची आहेत. पुणे परिक्षेत्रातील बाभळेश्वर वाहतूक पोलीस केंद्रांर्तगत त्यातील सर्वाधिक २७ प्रकरणांची नोंद झाली. याशिवाय सुरक्षा पट्टय़ाचा वापर न केल्याने दोन आणि अनधिकृतरीत्या वाहने उभी करणे यांसह अन्य नियम उल्लंघनाच्या ५६ कारवाया करण्यात आल्या. एकूण १ लाख ६३ हजार ४०० रुपये दंडही आकारण्यात आला.
आधुनिक वाहनांद्वारे कारवाई
वाहतूक नियम उल्लंघन केलेल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी नागपूर, औरंगाबाद, पुणे विभागातील वाहतूक पोलिसांवर तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांचा ताफ्यातील ‘लेझर स्पीड गन’, ‘अल्कोहोल ब्रेथ ‘अॅनलायझर’ यांसह अन्य यंत्रणा असलेल्या वाहनांचा कारवाईसाठी वापर करण्यात येत आहे.
Samruddhi Mahamarga Accident Reasons
Highway