इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कर्नाटकातील कॉलेजमध्ये हिजाब घालण्यास बंदी घातल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. त्यानंतर आता पुन्हा कर्नाटकमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. ‘विवेका’ योजनेंतर्गत राज्यभरात सुरू होणाऱ्या १० हजार वर्गखोल्या भगव्या रंगाने रंगविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बोम्मई सरकारच्या या निर्णयावरूनही वाद निर्माण झाला आहे.
भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार ९९२ कोटी रुपये खर्चून राज्यभरातील सरकारी शाळांमध्ये स्वामी विवेकानंदांच्या नावाने १० हजार वर्गखोल्या बांधण्याची योजना आखत आहे. कालबुर्गी येथे सोमवारी बालदिनानिमित्त मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह शिक्षणमंत्री बीसी नागेश यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. वास्तुविशारदांच्या शिफारशींवर आधारित वर्ग खोल्या भगव्या रंगात रंगवण्याच्या सरकारच्या निर्णयाचा शिक्षणमंत्र्यांनी बचाव केला.
बीसी नागेश म्हणाले की, “त्यात काही चूक आहे का? भगवा रंग नाही का? वास्तुविशारदांनी भगवा रंग सूचवला तर आम्ही रंगवू. खिडक्या, दरवाजे, पायऱ्या कशा असाव्यात हे सरकार ठरवणार नाही. आमच्याकडे वास्तुविशारद आहेत आणि आम्ही त्यांच्या शिफारशींच्या आधारे निर्णय घेतला आहे. वर्ग खोल्या भगव्या रंगात रंगवण्याच्या विरोधकांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना मंत्री म्हणाले की, “काही लोकांना भगव्याची अॅलर्जी आहे. त्यांच्या (काँग्रेस) झेंड्यातही भगवा आहे, त्यांनी तो का ठेवला आहे? तोही काढून टाका आणि पूर्णपणे हिरवा करा.
मुख्यमंत्री बसवरद बोम्मई यांनी बंगळुरू येथील विधानसौधासमोर माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर बोलताना ते म्हणाले की, विरोधकांनी प्रत्येक गोष्टीचे राजकारण करू नये. आमच्या राष्ट्रध्वजाचा रंग भगवा आहे. त्याबद्दल त्यांना का राग येतो? स्वामी विवेकानंदांच्या नावाने शाळांच्या इमारती बांधण्यात आल्या आहेत. विवेकानंद हे संन्यासी होते. ते भगवे कपडे घालायचे. विवेक या शब्दाचा अर्थ आहे सर्वांसाठी ज्ञान. त्यांना शिकू द्या.”
Karnataka New Controversy School Classroom Saffron Colour