मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सत्तेची हाव सर्वच राजकारण्यांना असते असे म्हटले जाते, त्यामुळे सत्ता स्पर्धेतून संघर्ष निर्माण होतो. सदर संघर्ष सत्ताधारी व विरोधकांमध्ये असतो, तसाच तो सत्ताधारी घटक पक्षांमधील दोन गटातील दोन नेत्यांमध्ये देखील असतो, सध्या सत्ताधारी घटक पक्षातील दोन वेगवेगळ्या पक्षांचे आमदार यांच्यातील वाद चांगलाच विकोपाला गेला आहे, त्यावर तोडगा काढण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यस्थी करणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील दोन सत्ताधारी आमदारां रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीत बच्चू कडू या हे देखील सामील झाले. कडू यांनी शिंदे यांना पाठींबा देण्यासाठी कोट्यवधी रुपये घेतल्याचा आरोप राणा यांनी केला. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप -प्रत्यारोप सुरु झाले असून हा वाद काही मिटत नाही असे दिसते. त्यामुळेच मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ३० ऑक्टोबर रोजी आमदार रवी राणा व बच्चू कडू या दोघांची ‘वर्षा’ या आपल्या शासकीय निवासस्थानी भेट घेणार आहेत. दुपारी ३ वाजता ही भेट होणार असल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कडू व राणांमध्ये पेटलेल्या राजकीय वादावर आज तोडगा निघणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. आमदार बच्चू कडू हे सध्या मुंबईत असून आमदार रवी राणा मुंबईसाठी अमरावतीहून रवाना झाले आहेत. याबाबत रवी राणा म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे नेते आहेत. नेत्यांनी बोलावल्यानंतर जावे लागणार आहे.
विशेष म्हणजे शिंदे गटासोबत येण्यासाठी बच्चू कडूंनी पैसे घेतले, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. त्यावर स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. माझ्यासोबत कोणताही आमदार पैशासाठी आला नाही. तर, महाराष्ट्राच्या विकासासाठी, स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारासाठी आमदार माझ्यासोबत आले, असे शिंदे म्हणाले आहेत.