त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकराजाच्या पिंडीचा वज्रलेप निखळू लागल्याने विश्वस्त मंडळासह भाविकांमध्ये चिंता पसरली आहे. विश्वस्तांनी याची दखल घेत पुरातत्त्व खात्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे. काही दिवसांपासून होत असलेली झीज पूजक आणि भक्तांमध्ये चर्चेत होती. मात्र, गर्भगृह दर्शन बंद होईल म्हणून याबाबत जाहीर वाच्यता झाली नाही. तथापि, शुक्रवारी याचा पंचनामा करण्यात आला. प्रसिध्दी माध्यमांमधून सदर वृत्त प्रसिध्द झाल्यावर संबंधित यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. याबाबत पुरातत्त्व खाते नेमकी काय भूमिका घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिर केंद्रीय पुरातत्व खात्याच्या आखत्यारित येते. या खात्याचे देवस्थानकडे म्हणावे तसे लक्ष नाही. भक्तांच्या सुविधांसाठी येथे
होणाऱ्या कामांबाबत त्यांचे सहकार्य मिळत नाही. संवर्धन करण्यासाठीही या खात्याची मानसिकता नसल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. यापूर्वीचा वज्रलेप १६ वर्षांपूर्वी दि. २२ फेब्रुवारी २००६ च्या रात्री तत्कालीन विश्वस्त आणि मंदिराशी संबंधितांनी पुरातत्व सहकार्याने वज्रलेप केला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी दुपारच्या पूजकांनी त्यास हरकत घेत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी वज्रलेप करताना देवाचा मूळ आकार बदलला असल्याचे त्यांचे म्हणणे होते.याबाबत तेव्हाच्या खासदारांमार्फत हा प्रश्न थेट लोकसभा अधिवेशनात पोहचला होता. त्यानंतर सोळा वर्षांत हा वादग्रस्त ठरलेला वज्रलेप निघण्यास सुरुवात झाली आहे. त्यावेळी झालेल्या वज्रलेपाचे कोटिंग करण्याची प्रक्रिया बाकी होती. त्यामुळे असे घडत असल्याचे म्हटले जात आहे.
असा आहे पंचनामा
दिनांक १६ रोजी प्रातःकालचे पूजक समीर दशपुत्र नित्य पूजा करीत असताना सकाळी ८.३० ते ८.४० यादरम्यान अचानक त्र्यंबकराजांच्या मुख्य पिंडीतील श्री ब्रह्मदेव व श्री शंकरदेव यांच्या लिंगावरील गोल आवरणाचे काही भाग निघाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी देवस्थानचे शागीर्द सुरेंद्र कुलकर्णी उपस्थित होते. त्र्यंबकराजांच्या पिंडीतील निघालेले देवांचे भाग सुरेंद्र कुलकर्णी यांनी देवस्थानचे सुरक्षा अधिकारी योगेश सोलंकी यांच्याकडे जमा केले. पिंडीच्या निखळलेल्या वज्रलेपाचे दोन भाग असून, दोन बाय
दोन इंच आकाराचे आहेत. त्यातील एक भाग थोडासा लांबगोल असून, दुसरा चपट, पातळ आकाराचा आहे. यावेळी गर्भगृहात पुजारी कैलास देशमुख, आकाश तुंगार उपस्थित होते.
तातडीने उपाययोजनांची आवश्यकता
त्र्यंबकराजाच्या पिंडीवर जागोजागी खळगे निर्माण झाले आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवांची अगोदरच झीज झालेली होती. आता त्यावर केलेला वज्रलेप निघत असून आतील झीज झालेला भाग नजरेस येत आहे. पिंडीचे आणि आतील खळग्यांचे कंगोरे झिजले आहेत. शुक्रवारी असाच एक कंगोरा दोन ठिकाणी निघाला असून, बाजूचा निघण्याच्या स्थितीत आहे.
त्र्यंबकराच्या पिंडीला पुन्हा वज्रलेप करून संवर्धन करण्याची आवश्यकता आहे. आम्ही त्यासाठी पुरातत्त्व खात्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे. यापुढे पिंडीची झीज होणार नाही यासाठी आणखी काय उपाययोजना करणे शक्य आहे? त्याचा अभ्यास सुरू आहे.
– भूषण अडसरे, विश्वस्त
वज्रलेप मूळ देवाचा आकार बदलवणारा नसावा. त्रिकाल पूजे व्यतिरिक्त केवळ भक्तांच्या समाधानासाठी देवावर पंचामृत
आदी पूजा साहित्य वाहिले जाते. त्यामध्ये रासायनिक घटक असतात. त्यास प्रतिबंध करण्याची गरज आहे.
– डॉ. सत्यप्रिय शुक्ल, पूजक व विश्वस्त
Trimbakeshwar Jyotirlinga Archeology Temple Trustee