मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. या बैठकीत एकूण ६ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीत विविध प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा देत शिधा वस्तूंचे पॅकेज १०० रुपयात देण्याचा मोठा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा उद्या होत आहे. त्यापार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेऊन शिंदे यांनी एकप्रकारे एक पाऊल पुढे टाकल्याचे बोलले जात आहे. बैठकीत झालेले निर्णय खालीलप्रमाणे
शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट
दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ १०० रुपयात देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या संचामध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना प्रती १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल याचा समावेश असेल. राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे 7 कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. हा संच एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येऊन त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्धारे करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण ४८६ कोटी ९४ लाख खर्चास देखील मान्यता देण्यात आली.सदरहू शिधावस्तूंचा संच दिवाळी पूर्वी वाटप व्हावा त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
जनसामान्यांची दिवाळी गोड करणारा निर्णय – बावनकुळे
दिवाळीसाठी राज्यातील सात कोटी रेशनकार्ड धारकांना अवघ्या शंभर रुपयात प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि तेलाचे पॅकेज देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतल्याबद्दल आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा – शिवसेना युती सरकारचे अभिनंदन करतो. या संवेदनशील निर्णयामुळे सर्वसामान्य माणसाची दिवाळी गोड होईल, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी व्यक्त केली.
बावनकुळे म्हणाले की, कोरोनाच्या संकटातून आपण सर्वजण बाहेर पडत असून समाजात नवा उत्साह निर्माण झाला आहे. भाजपा – शिवसेना युती सरकारने निर्बंध उठविल्यामुळे दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्री हे सण दोन वर्षांनी उत्साहात साजरे झाले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे दिवाळीही उत्साहात साजरी होणार आहे. हे सरकार सर्वसामान्य माणसाला न्याय देणारे सरकार आहे.
ते म्हणाले की, पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच घरबांधणीसाठी बँकांमार्फत कर्ज देण्याचाही महत्त्वाचा निर्णय भाजपा – शिवसेना युती सरकारने घेतला आहे. ऊन, पाऊस, थंडी, वारा याची पर्वा न करता सदैव दक्षतेने नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या पोलीस दलाला दिलासा देणारा हा निर्णय आहे. राज्य मंत्रिमंडळाने भंडारा जिल्ह्यातील सुरेवाडा उपसा सिंचन योजनेस गती देण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. तसेच उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील विभागांना उपयुक्त ठरणाऱ्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या खर्चास मंत्रिमंडळाने मान्यता व याचा ८ दुष्काळी तालुक्यांना फायदा होणार आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पास गती देण्यासाठी सुधारित खर्चास मान्यता देण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे, असेही ते म्हणाले.
7 Crore Ration Card Holders Diwali Gift