नवी दिल्ली – राफेल लढावू विमानाच्या खरेदीवरून भाजप आणि काँग्रेसदरम्यान पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राफेल खरेदीत ११ लाख युरो (जवळपास ९.५ कोटी रुपये) दलालाने घेतल्याचा दावा फ्रांसचे पोर्टल मीडियापार्टच्या एका बातमीत करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. तर भाजपने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी फ्रांसमध्ये सुरू असलेल्या कॉर्पोरेट स्पर्धेकडे रोख ठेवला आहे. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी राफेलसोबत झालेल्या करारावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
कथित दाव्यावर काँग्रेसची मागणी
मीडियापार्ट पोर्टलच्या बातमीचा आधार घेत काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, फ्रांसच्या लाचलुचपत विरोधी विभागाने दासौसोबत झालेल्या करारानंतर डेफसिस सोल्यूशन्सला राफेलचे ५० मॉडेल बनविण्यासाठी ११ लाख युरो दिले होते. परंतु कंपनी हे मॉडेल बनविण्यात अयशस्वी ठरली. दोन सरकारांमध्ये झालेल्या करारात दलालीची रक्कम दिली जाणे गंभीर आहे. पंतप्रधान मोदी यांना याचे उत्तर द्यावे लागेल.
करारात कोणत्याही मध्यस्थाची कोणतीच भूमिका असणार नाही, असे करारात स्पष्ट शब्दात लिहिण्यात आले आहे मीडियापोर्टच्या वृत्तावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सर्वोच्च न्यायालय आणि कॅग यांनी यापूर्वीच करारारला क्लिनचिट दिली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
कथित मध्यस्थाचा काँग्रेसशी संबंध
डेफसिस सोल्यूशन्स आणि त्याचे मालक सुशेन गुप्ता यामधील मध्यस्थ म्हणून समोर आले आहेत. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणी २०१९ मध्ये सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सुशेन गुप्ताला अटक केली होती. सुशेन गुप्ताच्या पूर्ण कुटुंबाला आपण ओळखतो असे काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी स्वीकारले आहे. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची नावे समोर आली आहेत, असा आरोप रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. काँग्रेस राफेलवरून अनेक दिवसांपासून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु त्यांना यश मिळालेले नाही, असेही ते म्हणाले.
सुरक्षेशी खेळ
रविशंकर प्रसाद यांनी राफेल वादाला देशाच्या सुरक्षेशी जोडून काँग्रेसला फटकारले आहे. गेल्या वीस वर्षात देशाच्या वायूसेनेत युद्ध विमान खरेदी करण्यात आलेले नाही. राफेल आल्यानंतर वायूसेनेची क्षमता वाढली आहे. सुरक्षादलांच्या पराक्रमांवर प्रश्न उपस्थित करण्याची काँग्रेसची जुनी सवय आहे. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकच्या वेळी सुद्धा काँग्रेसने हेच केले होते, असे त्यांनी सांगितले.