ओझर येथील हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमधील (एचएएल) कर्मचारी हेरगिरी प्रकरणात सापडल्यानंतर नाशिकमधील संरक्षण संस्थांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात प्रकाश टाकणारी ही वृत्तमालिका….
इंडिया दर्पण विशेष वृत्तमालिका – सुरक्षेचे तीनतेरा – भाग ३
प्रवासी विमानातूनही ‘एचएएचल’ची हेरगिरी?
भावेश ब्राह्मणकर, नाशिक
ओझर येथील विमानतळ हे एचएएलच्या मालकीचे आहे. त्यामुळे ते संरक्षण विमानतळ आहे. याठिकाणाहून सध्या प्रवासी विमानसेवा सुरू आहे. मात्र, याच सेवेद्वारेही एचएएलची हेरगिरी करणे शक्य असल्याची बाब पुढे आली आहे. कारण, विमानातून काढल्या जाणाऱ्या फोटो आणि व्हिडिओवर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे एचएएलच्या आवाराची गोपनियता भंग होत आहे.
ओझर विमानतळावरुन सध्या अहमदाबाद, पुणे आणि हैदराबाद या तीन शहरांसाठीची सेवा सुरू आहे. एचएएलच्या आवारात केंद्रीय दलाकडून सुरक्षा ठेवली जाते. मात्र, ओझर विमानतळ हे उडान योजनेअंतर्गत निवडलेले असल्याने महाराष्ट्र सरकारकडून त्यास सुरक्षा पुरविली जाते. म्हणजेच, नाशिक ग्रामीण पोलिसांची सुरक्षा व्यवस्था आहे. विमानतळाच्या प्रवासी टर्मिनलपर्यंत स्मार्ट फोन व अन्य उपकणांना मुभा आहे. त्यानंतर विमानसेवा कंपनीच्या वाहनाद्वारे प्रवाशांना थेट धावपट्टीवर नेले जाते. तेथेही अनेक उत्साही प्रवासी फोटो काढतात. हेच फोटो सोशल मिडियावर शेअर केले जातात. म्हणजेच, संरक्षण दलासाठी असलेल्या धावपट्टीच्या ठिकाणी सर्रास स्मार्ट फोनचा वापर होतो.
केवळ इतकेच नाही तर जेव्हा प्रवासी विमानात बसतात तेव्हाही ते विमानाच्या खिडकीतून फोटो आणि व्हिडिओ काढत असतात. विमानाच्या उड्डाण होते वेळी आणि आकाशात गेल्यानंतरही हे प्रकार सुरूच असतात. म्हणजेच, ज्या धावपट्टी लगत एचएएलचा लढाऊ विमान निर्मितीचा कारखाना आहे आणि प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जो ओळखला जातो तेथे गोपनियतेचा सर्रास भंग होत असल्याचे वास्तव आहे. यासंदर्भातील अटकाव करण्यास चक्क एचएएल हतबल असल्याचेही समोर येत आहे. कारण, एचएएलची स्वतःची सुरक्षा व्यवस्था कुठेच नाही.
टर्मिनल आणि धावपट्टीच्या ठिकाणी नाशिक ग्रामीण पोलिसांची सुरक्षा आहे. तर, विमानात प्रवासी बसल्यानंतर ती बाब त्या त्या कंपनीच्या अखत्यारित येते. त्यामुळे एचएएलच्या आवाराचे फोटो किंवा व्हिडिओ याचे चित्रीकरण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजेच, एचएएलची गोपनियता राखायची असेल तर अशा प्रकारच्या बाबींनाही प्रतिबंध घालणे आवश्यक असल्याची बाब संरक्षण क्षेत्रातील सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
दीपक शिरसाठ या एचएएलच्या कर्मचाऱ्याने हेरगिरी केल्याचा संशय असताना एचएएलच्या सुरक्षेसाठी व्यापक स्वरुपातच विचार करण्याची गरज असल्याचे मतही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सुखोई, मिग यासारख्या लढाऊ विमानांची निर्मिती करणाऱ्या कारखान्याची सुरक्षा राखायची असेल तर त्यासाठी सर्वंकष असा आराखडा असणे आवश्यक आहे. आणि त्याची अंमलबजावणी करायला हवी, असे स्पष्टपणे सुरक्षा यंत्रणांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘इंडिया दर्पण’शी बोलताना सांगितले आहे.
(क्रमशः)