दिंडोरी – तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतमालाचे मोठे नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाले आहे.द्राक्ष छाटणी सुरू असून सातत्याने पडणारा पाऊस व बदलत्या वातावरणाने द्राक्ष फुटीवर परिणाम होत द्राक्ष घड जिरण्याचे प्रमाण वाढण्याने द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे.
दिंडोरी तालुक्यात खेडगाव,शिंदवड,कादवा कारखाना,मोहाडी,लखमापूर ,वणी पांडाने,तळेगाव जानोरी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले तर टोमॅटो सह विविध भाजीपाला पिकांचेही नुकसान होत आहे. द्राक्ष छाटणी या महिन्यात सुरू आहे मात्र सततच्या पडणाऱ्या पावसाने कोवळ्या फुटीवर विपरीत परिणाम होत आहे. द्राक्ष घड जिरण्याचे प्रमाण वाढत आहे बुरशीजन्य रोगांचा प्रार्दुभाव वाढला असून त्यासाठी शेतकरी महागडे औषधे फवारणी करत आहे, मात्र बागांमध्ये पाणी साचल्याने ट्रॅक्टर चालत नसल्याने फवारणीस अडचण येत आहे. या पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे.