अक्षय कोठावदे, (पिंपळनेर, ता. साक्री)
शुक्रवारी दुपारच्या सुमारास पिंपळनेर परिसराला मुसळधार पाऊस, वारा आणि गारपिटीने झोडपले असून शेतपिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. उंभरे परिसरात काही भागामध्ये जोरदार पाऊस व गारपिटीमुळे शेती पिक अक्षरशः वाहून गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
परिसरातील मक्याचे पिक वादळी वाऱ्यामुळे अक्षरशः आडवे झाले आहे. ऊंभरे येथील शेतकरी बाबूलाल सुकदेव अहिरे यांचे ३ एकर कापसाचे पिक पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे. हे नुकसान अंदाजे साडेतीन लाखांपेक्षा अधिक असल्याचे अहिरे यांचे म्हणणे आहे. रावसाहेब पाटील या शेतकऱ्याचा साडेतीन एकरावरील मका आणि ऊस उद्ध्वस्त झाला आहे. त्यांचेही नुकसान अंदाजे ४ ते साडेचार लाखांचे आहे. महेश पाटील यांचे ४ एकर डाळींब, मका पूर्णपणे नष्ट झाला आहे. त्यांचेही अंदाजे ९ ते साडेनऊ लाखांचे नुकसान आहे. परिसरातील इतरही अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हाताशी येत असलेले पिकच गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
परिसरात काही शेतातील कांदा चाळही जमीनदोस्त झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. उंबरे गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावातील काही दुकानांचेही पत्रे उडाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नसून परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.