पिंपळगाव बसवंत – निफाड तालुक्यातील बहुतांश ठिकाणी गुरुवारी (दि. २४ ) झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे मका, सोयबीनसह छाटणी केलेल्या द्राक्ष बागाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रशासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
अवकाळी पावसामुळे निफाड तालुक्यातील बहुतांश ठिकाणी उभ्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. कारसूळ शिवारातील शेतकरी वसंत एकनाथ जाधव यांचे दोन एकर मका पिक जोरदार पावसाने जमीनदोस्त केले. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मका, सोयबीनसह छाटणी केलेल्या द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या नुकसानीचे पंचनामे होणे गरजेचे असून, तहसीलदार दिपक पाटील, तालुका कृषी अधिकारी बी.जी.पाटील यांनी याकडे लक्ष देऊन नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी कारसूळ येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.
नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी
गुरुवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने माझ्या दोन एकर मका पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी.
– वसंत एकनाथ जाधव, शेतकरी, कारसूळ