त्र्यंबकेश्वर – येथील कालसर्प, नारायण नागबली विधी लवकरच सुरू होणार आहेत. त्यामुळे भाविकांसह पुरोहितांनाही दिलासा मिळणार आहे. तसेच गेल्या पाच महिन्यांपासून ठप्प असलेले येथील अर्थकारणही वेग घेणार आहे.
कालसर्प आणि नारायण नागबली या विधींसाठी संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असलेले त्र्यंबकेश्वर कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अडचणीत आले आहे. ज्या विधींसाठी सतत वेटिंग असते ते विधी लॉकडाऊनमुळे ठप्प झाले आहेत. यामुळे भाविक, पुरोहित आणि शहरातील व्यवसायही प्रचंड बाधित झाले आहेत. अखेर हे विधी सुरू होण्यासंदर्भातील हालचाली गतिमान झाल्या आहेत. नाशिक शहरात रामकुंड परिसरात दशक्रिया विधीसह अन्य विधी होत असताना त्र्यंबकला पुजाविधीस बंदी का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात आमदार हिरामण खोसकर यांनी प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसिलदार दिपक गिरासे, उपविभागीय पोलिस अधिकारी भिमाशंकर ढोले, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, मुख्याधिकारी संजय जाधव आदींसह नगरसेवक, पुरोहित संघ प्रतिनिधी यांची बैठक झाली. त्यांनी संगम घाट ठिकाण तसेच कुशावर्त परिसरात पाहणी केली.
पुरोहित मंडळींकडे काम करणारे कामगार, शहरातील कापड व्यापारी, फुल विक्रेते, भांडी, नागाची प्रतिमा विकणारे सोनार, लॉजिंग, हॉटेल आदी व्यावसायिकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. यावर बैठकीत चर्चा झाली. पुरोहित संघाची एक नियंत्रण समिती करुन कोरोनाच्या विविध नियमांचे पालन करुन विधी करण्याबाबत चर्चा झाली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा सहायक पोलिस निरीक्षक करपे यांनी दिल्या आहेत. येत्या एक-दोन दिवसात येथील विधी सुरू होण्याची चिन्हे आहेत. बैठकीला राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, शहराध्यक्ष मनोज कानव, विजय गांगुर्डे, पुरोहीत संघातर्फे डाॅ दिलीप जोशी, गिरीष जोशी, मोहन लोहगावकर, प्रसन्ना जोशी, राहुल फडके, पंकज धारणे, मंगेश दिघे, गटनेते समीर पाटणकर, नगरसेवक सागर उजे आदिंसह काही व्यापारी उपस्थित होते.
दरम्यान, त्र्यंबकला विधी सुरू करण्यासंदर्भात येथील एक शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबईत गेले आहेत.