श्याम उगले, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक- जिल्हा परिषद यंत्रणा स्थापण झाल्यापासून मधली प्रशासकीय राजवटीची काही वर्षे सोडल्यास नाशिक जिल्हा परिषदेत १९९७ पर्यंत कॉंग्रेसची एकहाती सत्ता होती. त्यानंतर २००२ पासून राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत दुय्यम भूमिका स्वीकारून कॉंग्रेसचे स्थानिक नेते जिल्हा परिषदेत सत्तेत राहिले. नाशिक जिल्ह्यात कॉंग्रेसच्या आमदारांची संख्या कमी होत गेली, तसतशी कॉंग्रेसची नाशिक जिल्हापरिषदेतील सदस्य संख्याही कमी होत गेली. आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात कॉंग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाही. यामुळे आगामी जिल्हापरिषद निवडणुकीत कॉंग्रेसची २०१७ च्या निवडणुकीतील ८ ही सदस्यसंख्या टिकून राहील की नाही, हा खरा प्रश्न आहे.
नाशिक हा एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र १९८५ च्या विधानसभा निवडणुकीपासून या किल्ल्याचे बुरूज ढासळत गेले. नाशिक जिल्हा परिषदेतहप कॉंग्रेसला १९९७ पासून उतरती कळा लागली. त्या निवडणुकीत कॉंग्रेसला पहिल्यांदाच बहुमताला आवश्यक असणा-या जागांपेक्षा कमी म्हणजे ३० सदस्य निवडून आले. तेव्हापासून आजतागायत कॉंग्रेसला जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळू शकले नाही. त्याचप्रमाणे त्यानंतरच्या प्रत्येक जिल्हापरिषद निवडणुकीत कॉंग्रेसची सदस्यसंख्या घटत गेली. मागील म्हणजे २०१७ च्या निवडणुकीत ती संख्या आठ होती. आता २०२५ च्या जिल्हापरिषद निवडणुकीत कॉंग्रेसची कामगिरी कशी असेल, याविषयी बोलण्याआधी २०१७ मध्ये कॉंग्रेसला हे यश कोणामुळे व कोणकोणत्या तालुक्यांमध्ये मिळाले होते याचा थोडक्यात आढावा घेऊ. त्यातून आपोआपच कॉंग्रेसची आतीची ताकद काय आहे, याचा अंदाज येईल.
कॉंग्रेसच्या सात जिल्हापरिषद सदस्यांपैकी बागलाण, कळवण, चांदवड, नांदगाव, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांतून प्रत्येकी एक व दिंडोरी तालुक्यातून दोन असे आठ सदस्य निवडून आले होते. कॉंग्रेसचे आठ जिल्हापरिषद सदस्य निवडून आलेल्या या सात तालुक्यांत आता कॉंग्रेसची काय स्थिती आहे, याचा विचार करू. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर या विधानसभा मतदारसंघात २०१७ च्या निवडणुकीवेळी कॉंग्रेसच्या निर्मला गावित आमदार होत्या. निर्मला गावित आता
आमदार नसून त्या शिवसेनेत आहेत. इगतपुरी तालुक्यातून त्यांच्या सुकन्या नयना गावित निवडून आल्या होत्या. आता कॉंग्रेसकडे इगतपुरी तालुक्यात चेहराच उरला नाही. त्र्यंबकेश्वर तालुक्यात अंजनेरी गटात कॉंग्रेसला मिळालेले यश प्रामुख्याने संपतराव सकाळे यांच्यामुळे मिळाले होते. सकाळे सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आहेत. याबाबींचा विचार केल्यास या दोन्ही तालुक्यांमध्ये कॉंग्रेसला फारसा वाव उरलेला नाही.
मागील निवडणुकीत कॉंग्रेसला दोन सदस्य निवडून देणा-या दिंडोरी तालुक्याचा विचार केल्यास हे यश प्रामुख्याने माजी आमदार रामदास चारसकर यांच्यामुळे मिळाले होते. आता चारसकर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आहेत. त्यामुळे कॉंग्रेसला दिंडोरी तालुक्यातही यावेळी काही संधी दिसत नाही. चांदवडमध्ये कॉंग्रेसचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्यासारखा नेता असूनही मागील निवडणुकीत वडनेतभैरव गटातून शोभा कडाळे या एकमेव सदस्या निवडून आल्या होत्या. आता शिरीष कोतवाल यांनी नुकतेच चांदवड बाजार समिती सभापती निवडणुकीत भाजप आमदार डॉ. राहुल आहेर यांच्याशी हातमिळवणी केली होती. चांदवड-देवळा या मतदारसंघातील बदललेली राजकीय समिकरणे बघता, शिरीष कोतवाल यांच्या भूमिकेवर चांदवडमधील कॉंग्रेसचे भवितव्य ठरणार आहे.
नांदगावच्या न्यायडोंगरी गटातून कॉंग्रेसचे माजी आमदार अनिल आहेर यांच्या सुकन्या अश्विनी आहेर कॉंग्रेसकडून निवडून आल्या होत्या. नांदगावमधील सर्वच प्रस्थापित आता शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यासोबत आहेत. यामुळे नांदगावमध्ये कॉंग्रेसचे यश अनिल आहेर यांच्या भूमिकेवर व त्यांच्यापुरतेच मर्यादित राहणार आहे. बागलाण व कळवण या दोन तालुक्यांत मागील निवडणुकीत विजयी झालेले प्रत्येकी एक सदस्य हे तेथील स्थानिक कार्यकर्त्यांच्या बळावर निवडून आले होते. ते कार्यकर्ते अजूनही कॉंग्रेससोबत आहेत. त्यातच बागलाण तालुका ज्या धुळे लोकसभा मतदारसंघात आहे, तेथे कॉंग्रेसच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव निवडून आलेल्या आहेत. यामुळे बागलाणमधील कॉंग्रेस कार्यकर्त्यांची ताकद वाढलेली आहे. परिणामी बागलाण व कळवण या दोन तालुक्यांमध्ये कॉंग्रेसला किमान मागील जागा टिकवता येतील, अशी स्थिती आहे.
उरलेल्या ज्या तालुक्यांमध्ये कॉंग्रेसला यश मिळाले नव्हते, त्या तालुक्यांमध्ये कॉंग्रेसची स्थिती आणखी बिकट झालेली असल्याने तेथे काही चमत्कार होईल, अशी आशा ठेवण्यात काहीही अर्थ दिसत नाही. यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत कॉंग्रेसच्या जागा आणखी कितीने घटणार, एवढाच उत्सुकतेचा विषय असणार आहे. कॉंग्रेसने पक्षवाढीसाठी कोणतेही प्रयत्न न केल्याचा हा परिणाम आहे.
shaymugale74@gmail.com