श्याम उगले, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक: राज्यात २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातही भाजपची ताकद वाढली. त्याचे प्रत्यंतर नाशिक महापालिका व जिल्हापरिषद निवडणुकीत आले. नाशिक जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच भाजपचे दोन आकडी म्हणजे १६ सदस्य निवडून आले. मात्र, गेल्या पाच वर्षात भाजपने ग्रामीण भागातील पक्ष संघटना पूर्णपणे आहेर कुटुंबाच्या भरवशावर सोडल्याने दोन विधानसभा मतदार संघापालिकडे भाजपचा विस्तार होऊ शकला नाही. यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला प्रभाव वाढवण्यासाठी इतर पक्षातून चांगले कार्यकर्ते पक्षात आणणे हाच एकमेव पर्याय असणार आहे.
नाशिक जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाचे २०१७ च्या निवडणुकीत १५+१ (अपक्ष) सदस्य निवडून आले होते. भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्या युतीला मिळून ७३ पैकी ४२ जागा मिळाल्या होत्या. मात्र, दोन्ही पक्षांनी एकमेकांशिवाय दुसरा कोणीही चालेल अशी भूमिका घेतली. परिणामी एकदा काँग्रेसला व एकदा राष्ट्रवादीला उपाध्यक्ष देऊन शिवसेनेने अध्यक्षपद स्वतःकडे ठेवले. आता राजकीय समीकरण बदलले असून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ११ आमदारांपैकी ७ आमदार राष्ट्रवादीचे व प्रत्येकी दोन दोन आमदार भाजप-शिवसेनेचे आहेत. भाजपच्या दोन आमदारांच्या मतदारसंघात १५ जिल्हा परिषद गट आहेत.
या निवडणुकीतील भाजपच्या संभाव्यशक्तीचा विचार करण्याआधी भाजपचे मागील निवडणुकीत १६ सदस्य कसे विजयी झाले होते, याचा आढावा घेऊया. नाशिक जिल्ह्यात २०१७ मध्ये माणिकराव कोकाटे, अद्वय हिरे, तत्कालिन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार दिलीप बोरसे हे ग्रामीण भागात भाजपची धुरा सांभाळत होते. मागील आठ वर्षांत हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन झाले असून माणिकराव कोकाटे राष्ट्रवादीकडून मंत्री झाले आहेत. अद्वय हिरे सध्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आहेत. आमदार डॉ. राहुल आहेर व दिलीप बोरसे हे दोघेही भाजपचे आमदार असून या दोघांच्या भरवशावर भारतीय जनता पक्षाची मदार आहे. अर्थात या दोघांचा प्रभाव केवळ चांदवड, देवळा व बागलाण या तालुक्यांपुरता मर्यादित आहे. या तीन तालुक्यांत मिळून जिल्हापरिषदेचे १५ गट येतात. भारतीय जनता पक्षाला जिल्हापरिषदेत चांगले यश मिळवायचे असेल, तर त्यांना इतर तालुक्यांतही आपला प्रभाव वाढवावा लागणार आहे.
निवडणुका तोंडावर असल्याने इतर पक्षातून नेते, कार्यकर्ते यांचे पक्षांतर करणे एवढा एकच मार्ग पक्षासमोर दिसत आहे. सिन्नरमध्ये मागील निवडणुकीत भाजपात असलेले सध्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे राष्ट्रवादीत आहेत. त्यावेळी सिन्नरमधील देवपूर गटातून सीमंतिनी कोकाटे या भाजपच्या एकमेव सदस्य विजयी झाल्या होत्या. माणिकराव कोकाटे यांचे विरोधक असलेले खासदार राजाभाऊ वाजे ठाकरेंच्या शिवसेनेत असून दुसरे विरोधक उदय सांगळे सध्या भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात आहे. ते भाजपमध्ये आल्यास सिन्नर तालुक्यात भाजपची ताकद वाढून जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीत भाजपला फायदा होऊ शकेल. निफाड तालुक्यात मागील निवडणुकीत लासलगाव गटातून डी. के. जगताप हे भाजपचे एकमेव सदस्य विजयी झाले होते व ओझरमधून अपक्ष विजयी झालेले यतीन कदम यांनी भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले होते. आता यतीन कदम भाजपचे जिल्हाध्यक्ष झाले आहेत, यामुळे निफाडमधून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
येवला, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, नाशिक, कळवण, पेठ या तालुक्यांमध्ये भाजपचा एकही सदस्य विजयी झाला नव्हता. आताही या तालुक्यांमध्ये भाजपच्या पक्ष संघटनेत फार बदल झाल्याचे दिसत नाही. माजीमंत्री बबनराव घोलप यांचा भाजप प्रवेश जिल्हा परिषदेपेक्षा महापालिका क्षेत्र डोळ्यासमोर ठेवून झाला असल्याने नाशिक तालुक्यातूनही भाजपला फार आशा धरता येणार नाही. चांदवड देवळा या विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत देवळ्याचे तीन व चांदवडचे चार असे सात गट होते. त्यात लोहोणेर गटातून धनश्री केदा आहेर व तळेगाव रोही गटातून डॉ. आत्माराम कुंभार्डे हे दोन भाजपचे दोन सदस्य होते. आता केदा आहेर व डॉ. कुंभार्डे या दोघांनीही भाजपला सोडचिट्ठी दिलेली आहे. यामुळे आमदार डॉ. राहुल आहेर यांना किमान मागील निवडणुकीतील कामगिरी टिकवण्याचे आव्हान आहे. मालेगाव तालुक्यातून मागील निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक ५ सदस्य विजयी झाले होते. त्याला कारण म्हणजे अद्वय हिरे त्यावेळी भाजपमध्ये होते. त्यांची वैयक्तिक ताकद भाजप उमेदवारांच्या पाठीशी होती. आता अद्वय हिरे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आहेत, त्याचा फटका भाजपला बसू शकतो.
भाजप व हिरे यांची मतविभागणी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या उमेदवारांना फायद्याची ठरू शकते. बागलाणमधून २०१७ मध्ये भाजपचे ४ जिल्हा परिषद सदस्य विजयी झाले होते. ती कामगिरी यावेळीही होऊ शकते, असे विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून दिसत आहे. नांदगाव व सुरगाण्यात भाजपचे प्रत्येकी एक सदस्य विजयी झाले होते. आता माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण हयात नाहीत, त्यामुळे तेथे भाजपला कितपत यश मिळेल, याबाबत साशंकता आहे. त्याचप्रमाणे नांदगावची जागा टिकवण्याचेही भाजपसमोर आव्हान आहे. या सर्व बाबींचा विचार केल्यास भाजपची ग्रामीण भागातील ताकद मागील आठ वर्षांत कमी झालेली आहे. त्यावेळी पकपक्षासोबत असलेले अनेक कार्यकर्ते, नेते पक्ष सोडून गेले आहेत. नवीन आयात करण्याची संधीही फार दिसत नाही. याबाबींचा विचार केल्यास भाजपला मागील निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या इतिहासात मिळालेले सर्वात मोठे यश २०२५ च्या निवडणुकीत टिकवून ठेवण्याचेच मोठे आव्हान आहे.
shaymugale74@gmail.com