श्याम उगले, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक – नाशिक जिल्हापरिषदेच्या २०१७ च्या निवडणुकीत २६ जागांसह शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष होता. गेल्या आठ वर्षांमध्ये पुलाखालून बरेचसे राजकीय पाणी वाहून गेले आहे. शिवसेनेत फूट पडून दोन शिवसेना अस्तित्वात आल्या आहेत. निवडणू्क आयोगाने मान्यता दिलेली एकनाथ शिंदे यांची शिवसेना सत्तेत असून उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरोधी पक्षनेता पद मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. या पार्श्वभूमिवर होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांसमोर २०१७ ची कामगिरी टिकवणे दूरच, अस्तित्व टिकवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्हापरिषदेचे कार्यक्षेत्र असलेल्या ११ विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे दोन आमदार विजयी झालेले आहेत, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा एकही आमदार नाही. जिल्हा परिषद निवडणुकीत स्थानिक आमदारांची भूमिका महत्वाची असते. मागील म्हणजे २०१७ च्या निवडणुकीवेळी शिवसेनेचे चार आमदार होते. आता दोन्ही शिवसेना मिळून केवळ दोन आमदार असल्याने या दोन्ही पक्षांसमोर मोठे आव्हान आहे. यावर हे दोन्ही पक्ष कशी मात करतात, हे दिसणारच आहे.
नाशिक जिल्हापरिषदेची २०१७ ची निवडणूक युती अथवा आघाडी करून नाही, तर शिवसेना, भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी या चारही पक्षांनी स्वतंत्र लढवली होती. त्यावेळी इगतपुरी, सिन्नर, निफाड, येवला, दिंडोरी, नांदगाव, मालेगाव, नाशिक, पेठ या नऊ तालुक्यांमध्ये शिवसेना प्रमुख स्पर्धेत होती. या नऊ तालुक्यांमधील ४७ जागांवर शिवसेनेकडे प्रबळ उमेदवार होते. त्यापैकी २६ गटांमध्ये शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. नाशिक व मालेगाव या तालुक्यांमध्ये शिवसेनेचे आमदार असूनही तेथे शिवसेनेला मोठा फटका बसला. यामुळे शिवसेनेची घोडदौड २६ जागांवर थांबली. शिवसेनेचे आमदार असलेल्या सिन्नर व निफाड या तालु्क्यांत शिवसेनेला चांगले यश मिळाले. या शिवाय २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार दुस-या क्रमांकावर असलेल्या नांदगाव, दिंडोरी-पेठ, येवला, इगतपुरी या तालुक्यांतही शिवसेनेला लक्षणीय यश मिळाले. याचा अर्थ २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार असलेल्या इगतपुरी-त्र्यंबकेश्वर, सिन्नर, निफाड, येवला, दिंडोरी-पेठ, नांदगाव, मालेगाव, नाशिक या मतदार संघांमध्येच शिवसेनेला यश मिळाले.
हे सर्व विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीवर विधानसभा निव़डणुकीचा मोठा प्रभाव असतो. मतदारसंघातील विजयी व दुस-या क्रमांकाचे उमेदवार यांच्या कार्यकर्त्यांमध्येच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रमुख लढती होत असतात. विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार दिले होते. त्यातील दोन उमेदवार नाशिक महापालिका हद्दीत होते व उर्वरित तीन उमेदवार निफाड, नांदगाव व मालेगाव (बाह्य) या मतदारसंघांत होते. या सर्व ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेचे नांदगाव व मालेगाव (बाह्य) या दोन विधानसभा मतदार संघातून अनुक्रमे सुहास कांदे व दादा भुसे विजयी झाले आहेत. म्हणजे एकूण गोळा बेरीज केल्यास दोन्ही शिवसेना मिळून जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात केवळ निफाड, नांदगाव व मालेगाव (बाह्य) या तीन विधानसभा मतदारसंघांत निवडणूक लढवली होती व तेथे जिल्हापरिषदेच्या गटांची संख्या २० च्या आत आहे. म्हणजेच विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने बघितले, तर दोन्ही शिवसेना मिळून २० च्या आसपास जिल्हापरिषद गटांवर प्रभाव असणार आहे. ही बाब लक्षात घेऊनच शिंदे यांच्या शिवसेनेने ग्रामीण भागात काही मोहरे गळाला लागतात का याची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे.
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या माजी आमदार निर्मला गावित या नुकत्याच शिंदे यांच्या शिवसेनेत आल्या असल्याने इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या तालुक्यांत शिंदे यांच्या शिवसेनेला जिल्हापरिषद निवड़णुकीत तुल्यबळ उमेदवार मिळणार आहेत. मालेगाव व नांदगाव या तालुक्यांमध्ये दोन्ही शिवसेनांमध्येच प्रमुख लढती होण्याची चिन्हे दिसत आहेत. पेठ तालुक्यात भास्कर गावित यांचे वर्चस्व असून एवढ्या पडझडीतही ते उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले आहेत. यामुळे त्या तालुक्यातील दोन गटांवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रभाव असणार आहे. दिंडोरीतील शिवसेनेची दोन्ही शिवसेनांमध्ये विभागणी झाल्याने तेथील परिस्थिती अधांतरी आहे. निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांचा विधानसभेला सलग दोनदा पराभव झाल्याने तेथे पुनरुज्जीवनाचे मोठे आव्हान असणार आहे.
सिन्नरमध्ये काय होणार
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत भोपळा मिळाला असला तरी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहेत. त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील सिन्नर व इगतपुरी-त्र्यंबकेश्वर हे दोन विधानसभा मतदारसंघ जिल्हापरिषदेच्या कार्यकक्षेत येतात. त्यात खासदार वाजे सिन्नरचे एकदा आमदार राहिलेले आहेत. यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत सिन्नरच्या सहा गटांमध्ये त्यांचा प्रभाव असणार हे सैद्धांतिकदृष्ट्या वाटत असले तरी व्याव्हारिकदृष्ट्या परिस्थिती वेगळी आहे. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत खासदार वाजे व उदय सांगळे सोबत होते. त्यामुळे शिवसेनेने सिन्नर तालुक्यातील सहा पैकी पाच गटांवर विजय मिळवला होता. आता राजकीय समिकरणे बदलली असून वाजे व सांगळे यांचे सवते सुभे झाले आहेत. तसेच खासदार वाजे व कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत एकमेकांना मदत केल्याने खासदार वाजे यांच्या समर्थकांमध्ये दुफळी झाली असून ते कोकाटे व सांगळे यांच्यात विभागल्याने सिन्नरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची २०१७ एवढी ताकद उरलेली नाही.
—
shaymugale74@gmail.com