इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सुमारे तीस वर्षांपूर्वी एका महिलेने बालकाला विमानात जन्म दिला होता, त्यामुळे या बालकाला कोणत्या देशाचे नागरिकत्व मिळावे ? या संदर्भात खूपच चर्चा झाली होती. तेव्हा हा बालक संपूर्ण जगाचा नागरिक होऊ शकतो असा निर्णय अमेरिकेतील एका न्यायालयाने दिला होता. या निर्णयावर बराच वाद रंगला होता. सध्या हे आठवण्याचे कारण म्हणजे जेव्हा एखाद्या आईवडील बनू इच्छीणाऱ्या पालकांनी परदेशात स्थलांतर केले, तर त्यांच्या होणाऱ्या मुलाला कोणत्या देशाचे नागरिकत्व द्यावे ? अनेकांना प्रश्न पडतो. परंतु याबाबत हायकोर्टाने निकाल जाहीर केला आहे .
भारताचे नागरिकत्व सोडताना जर पती-पत्नी आई-वडील होणार असतील, तर त्यांच्या पोटी जन्मलेले मूल पुन्हा भारतीय होण्याचा हक्कदार आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अनिता सुमंथ यांनी 22 वर्षांच्या अशाच एका मुलाची याचिका स्वीकारली आणि त्याला चार आठवड्यांच्या आत भारतीय नागरिकत्व देण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाला दिले.
2019 मध्ये मंत्रालयाने याचिकाकर्ते प्रणव श्रीनिवासन यांना नागरिकत्व नाकारले होते. दरम्यान, डिसेंबर 1998 मध्ये प्रणवच्या पालकांनी त्यांचे भारतीय नागरिकत्व सोडले. या याचिकेनुसार, प्रणवच्या पालकांनी डिसेंबर 1998 मध्ये भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून सिंगापूरचे नागरिकत्व घेतले होते. तेव्हा आई साडेसात महिन्यांची गरोदर होती.
प्रणवचा जन्म 1 मार्च 1999 रोजी सिंगापूरमध्ये झाला आणि त्याला जन्माने सिंगापूरचे नागरिकत्व मिळाले. मात्र प्रणवने भारतीय नागरिकत्व परत घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने मे 2017 रोजी सिंगापूर येथील भारतीय दूतावासात नागरिकत्वासाठी अर्ज केला. प्रणव म्हणतो की तो गर्भात असतानाही तो भारतीयच होता.
याचिकाकर्त्याने गर्भ तथा भ्रुण म्हणून भारतीय नागरिकत्व प्राप्त केले होते. उच्च न्यायालयाने प्रणवला भ्रूण म्हणून अपत्याचा दर्जा मिळवून दिला होता. या अंतर्गत तो आपल्या आई-वडिलांमुळे भारतीय झाला होता. नंतर नागरिकत्व बदलले. अशा परिस्थितीत, तो नागरिकत्व नियमांनुसार भारतीय बनण्यास पात्र आहे