नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशभरात सध्या मोठी चर्चा आहे ती राहुल गांधी यांच्या सिक्युरीटी गार्डची. तो अचानक चर्चेत येण्याचे कारण म्हणजे गुलाम नबी आझाद. ज्येष्ठ नेते असलेल्या आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. मात्र, आझाद यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पाच पानी पत्रात राहुल गांधींच्या सिक्युरीटी गार्डचा उल्लेख केला आहे. राहुल हे त्याचे जास्त ऐकतात आणि ज्येष्ठ नेत्यांचे नाही असे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे सर्वांनाच प्रश्न पडला आहे की राहुल यांचा हा सिक्युरीटी गार्ड कोण आहे…
असे म्हटले जाते की, पक्षांच्या नेत्यांपेक्षा कधीकधी त्यांच्या आजूबाजूचे कार्यकर्ते हे अधिक प्रबळ ठरतात, त्यामुळे मुख्य नेत्यांऐवजी त्यांच्या आजूबाजूला असलेल्या नेत्यांनाच जास्त भाव येतो किंवा भाव असतो, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक असो की, सर्वसामान्य कार्यकर्ते त्या नेत्यांपुढे पोहोचू शकत नाहीत किंवा त्या नेत्यांऐवजी ही मंडळीच निर्णय घेतात की काय असाही आरोप केला जातो. गेल्या दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेमध्ये उभी फूट पडली तेव्हाही असाच आरोप केला गेला आणि त्या आजूबाजूच्या मंडळींना बडवे असा शब्द वापरला गेला. त्याचप्रमाणे आता काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत असलेल्या आजूबाजूच्या मंडळींना सेक्युरिटी गार्ड असा शब्दाचा वापर करण्यात आला. आता नेमके हे सिक्युरिटी गार्ड म्हणजे कोण? या संदर्भात उलट उलट चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पाच दशकांनंतर पक्ष सोडला आहे.
काँग्रेस सोडण्यापूर्वी आझाद यांनी लिहिलेल्या पत्रातील काही प्रश्नांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. या पत्रात आझाद यांनी लिहिले होते की, देशातील सर्वात जुना पक्ष आता समग्र रुपात नष्ट झालेला आहे. पक्षाचे केंद्रीय नेतृत्व अंतर्गत निवडणुकांच्या नावाने सगळ्यांना धोका देत आहे. त्यांनी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर अपरिपक्व आणि बालिश व्यवहार करीत असल्याचाही आरोप केला आहे.
सोनिया गांधी या केवळ नाममात्र नेत्या राहिल्या असल्याचे सांगत निर्णय राहुल गांधी करत असल्याचे म्हटले आहे. हे निर्णय राहुल गांधी यांचे स्वीय सहाय्यक आणि सुरक्षा रक्षक करत असल्याचा खळबळजनक आरोपही आझाद यांनी त्यांच्या पत्रात केला आहे. परंतु गुलाम नबी आझाद यांना गेल्या पन्नास वर्षात असे दिसले नाही का की आत्ताच त्यांना अचानकपणे साक्षात्कार झाला अशी देखील चर्चा सुरू आहे.
गुलाम नबी आझाद यांच्या पत्रात ज्या सिक्युरिटी गार्डचा उल्लेख करण्यात आला आहे, तो नेमका आहे तरी कोण, त्याच्य़ावर आझाद यांनी का प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर राहुल गांधी यांच्या वर्तुळातील नेत्यांवरही आझाद यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. गेल्या आठ वर्षांत पक्षावर गंभीर नसलेल्या नेतृत्वाला थोपवण्याचा प्रयत्न झाल्याने ही परिस्थिती उद्भवली असे आझाद यांनी म्हटले आहे. चमच्यांच्या संरक्षणात काँग्रेसची वाटचाल सुरु असल्याचा आरोपही आझाद यांनी केला आहे. ही कोण मंडळी आहेत, हेही जाणून घेऊयात.
एका वृत्तानुसार, गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यात सिक्युरिटी गार्ड असा जो उल्लेख करण्यात आला आहे, तो म्हणजे के.बी. बायजू. बायजू हे सुरुवातचीला स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमध्ये होते. राहुल गांधी हे सरचिटणीस झाल्यानंतर बायजू त्यांच्या टीममध्ये सहभागी झाले. बायजू यांच्याकडे पक्षाचे कोणतेही औपचारिक पद नसतानाही, त्यांचे राजकीय वजन चांगलेच वाढले आहे. इतकेच नव्हे तर बायजू हे राहुल गांधी यांच्या सुरक्षेसह इतरही महत्त्वाची कामे पार पाडतात. यात यावर्षीचा गोवा दौराही आहे. बायजू हे भारत जोडो यात्रेचे महत्त्वाचे घटक आहेत. राहुल गांधी यांचे दौरे पाहत असल्याने बायजू हे पक्षात पॉवरफुल झाले असल्याचे सांगण्यात येते. राहुल यांच्यासोबत कोणी किती वेळ घालवायचा ह बायजूच ठरवत असल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे राहुल यांच्यासोबत ते व्यासपीठावरही असतात. पंजाबमध्ये जेव्हा काँग्रेसमध्ये कलह झाला होता, तेव्हा राहुल गांधी यांचे वैयक्तिक दूत म्हणून बायजू हेच कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्याकडे गेले होते. यावरुन त्यांचे पक्षातील महत्त्व लक्षात येऊ शकेल. नंतर कॅप्टन काँग्रेसमधून बाहेर पडले. त्याचबरोबर आझाद यांनी पत्रात राहुल यांची मंडळी असा उल्लेख केला आहे, त्यात के.सी. वेणूगोपाल यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. वेणूगोपाल हे राहुल गांधी यांचे नीकटवर्तीय आहेत. २०१७ सारली त्यांना सरचिटणीस करण्यात आले होते, त्याच वर्षी राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते. वेणूगोपाल यांच्यापर्यंत पोहचणे त्यावेळी अवघड मानले जात असे. आझाद यांचे आरोप वेणूगोपाल यांनी फेटाळले आहेत. ज्याप्रमाणे आझाद हे राजीव आणि संजय गांधी यांचे नीकटवर्तीय होते.
त्याचप्रमाणे राहुल यांच्या टीममध्ये आपण असल्याचे वेणूगोपाल यांनी सांगितलेले आहे. राहुल यांच्या टीममध्ये रणदीपसिंह सुरजेवाला आणि अजय माकन हेही आहेत. परंतु गुलाम-नव्याचा यांचा आरोप नेमका कोणावर आहे या संदर्भात स्पष्टपणे म्हटलेले नाही त्यामुळे याची उलट सुलट चर्चा सुरू आहे परंतु गेल्या काही दिवसांपासून गुलाम नबी आझाद हे काँग्रेस पासून दूर जात होते आणि भाजपची जवळीक साधत होते अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
Who is Security Guard of Rahul Gandhi Politics Congress
Gulam Nabi Azad Letter