विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
कोरोनामुळे देशभरातील पर्यटन व्यवसाय गेल्या दीड ते दोन वर्षांपासून जवळपास थांबला आहे. परंतु पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार कडून उपायोजना करण्यात येत आहेत. या अंतर्गत रेल्वेच्या वतीने देखील प्रयत्न करण्यात येत आहेत. देशभरातील धार्मिक स्थळांचे दर्शन व्हावे, यासाठी विविध ठिकाणांहून पर्यटन यात्रा आयोजित करण्यात येत आहेत, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या वतीने ७ नोव्हेंबर पासून विशेष रामायण यात्रा ट्रेन चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे.
रामायण यात्रा ट्रेन प्रवास सफदरजंग स्टेशनपासून १७ दिवसांचा हा प्रवास सुरू होईल. विशेष म्हणजे सर्व आधुनिक सुविधा ट्रेनमध्ये उपलब्ध असतील. सदर ट्रेन ही पूर्णपणे वातानुकूलित असेल. या सहलीमध्ये शाकाहारी जेवण, एसी बस, एसी हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च यांचाही समावेश आहे. ही ट्रेन साडे सात हजार किलोमीटरचा प्रवास करेल. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर ट्रेन प्रथम भगवान श्रीराम यांचे जन्मस्थान अयोध्येला जाईल. तेथे प्रवासी श्रीरामजन्मभूमी मंदिर, श्री हनुमान गढी, शरयू घाट तसेच नंदीग्राम मधील भारत-हनुमान मंदिराला भेट देऊ शकतील. यानंतर ट्रेन सीतामढीला पोहोचेल, तेथे जानकीच्या जन्मस्थळाला भेट देता येईल. त्यानंतर काशी तिर्थक्षेत्रात श्रीकाशी विश्वनाथ मंदिर, संकट मोचन मंदिर, तुलसी मानस मंदिर, सीता संवत स्थळ, प्रयाग शृंगवेरपूर आणि चित्रकूट येथे भेट दिली जाईल.
दरम्यान, उत्तर भारतातून ही ट्रेन दाक्षिणेत श्री क्षेत्र नाशिकला जाईल, तेथे श्री काळा राम मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर, पंचवटीतील सीता गुंफासह तपोवनातील अन्य धार्मिक स्थळांना भेट दिली जाईल. नाशिकहून ही ट्रेन किष्किंधा शहर हंपीला पोहोचेल, या ठिकाणी राम भक्त अंजनी पर्वत येथे असलेल्या हनुमानाच्या जन्मस्थळाला भेट देऊ शकतील. या विशेष ट्रेनचा शेवटचा थांबा रामेश्वरम असेल. रामायण यात्रा ट्रेनमध्ये, फर्स्ट एसीमधील एका व्यक्तीचे भाडे १,१२,९५५ रुपये असेल, एकाच वेळी दोन तिकिटे घेणाऱ्या प्रवाशास १० हजाराची सवलत देऊन, प्रत्येक प्रवाशाचे भाडे केवळ १,०२,०९५ रुपये इतकेच असेल. त्याचप्रमाणे सेकंड एसीचे भाडे ९३,८१० रुपये आहे, दोन तिकिटे आरक्षित करण्यास सुमारे ११ हजारांची सुट देऊन प्रति प्रवासी फक्त ८२,९५० रुपये मोजावे लागतील.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची परवानगी असेल. ‘आओ देखो अपना देश ‘ अभियान अंतर्गत ही ट्रेन चालवली जात आहे. या ट्रेनमध्ये रेस्टॉरंट, आधुनिक किचन, हात – पाय मालिश सुविधा आणि लायब्ररी, सुरक्षा रक्षक तैनात केले जातील, इलेक्ट्रॉनिक लॉकर्स असतील, सीसीटीव्ही कॅमेरे अशा सुविधा या ट्रेनमध्ये उपलब्ध असतील.