अहिल्यानगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील तांबटकर मळा येथे आयोजित विभागीय साईज्योती सरस २०२५ महिला बचतगट निर्मित खाद्यपदार्थ व वस्तुंच्या विक्री प्रदर्शनाचे राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी राज्याला दिशादर्शक ठरेल अशा पद्धतीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने असलेल्या अद्ययावत उमेद मॉलची जिल्हास्तरावर उभारणी करण्यात येईल, तसेच प्रत्येक तालुक्यात ‘उमेद मॉल’ची उभारणी करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही श्री. विखे पाटील यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल शेळके, विनायक देशमुख आदी उपस्थित होते.
बचतगटांसाठीच्या विभागीय प्रदर्शन आयोजनाचा जिल्ह्याला पहिल्यांदाच मान मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी राज्यभरात ‘उमेद मॉल’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात चार लाख महिला या बचतगटांच्या माध्यमातून जोडल्या गेल्या आहेत. ‘उमेद मॉल’च्या माध्यमातून बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीमध्ये एक मोठे परिवर्तन येणार आहे. महिलांनी उत्पादित केलेल्या मालाची वर्गवारी करण्यात येऊन त्या पद्धतीचे मार्केटिंग तयार करण्यात यावे. उत्पादित मालाची ऑनलाईन विक्रीची सुविधा सुरू करण्यात आली असून यात वृद्धीसाठी प्रयत्न करावेत, यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी दिली.
ते म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठे पाऊल टाकले आहे. देशाच्या विकासातील प्रत्येक उपक्रमात महिलांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. महिलांमध्ये असलेली उद्यमशिलता, क्रियाशक्तीला अशा प्रकारच्या उपक्रमांची साथ दिल्यास निश्चितच महिलांमध्ये अधिक प्रमाणात उर्जाशक्ती निर्माण होऊन देशाच्या विकासाला अधिक चालना मिळेल.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनामार्फत अनेकविध योजना राबविण्यात येत असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत जिल्ह्यातील १२ लाख महिलांच्या खात्यावर १२० कोटी रुपयांचा निधी वितरित केला असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. येरेकर म्हणाले, जिल्ह्यात उमेद अभियान ही एक लोकचळवळ बनते आहे. ४ लाख महिलांचा अभियानात समावेश करून घेण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये एकूण १ हजार १७४ महिला ग्रामसंघ तयार झालेले असून त्यापैकी ७५५ ग्रामसंघांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कार्यालय उपलब्ध करून देणारा अहिल्यानगर जिल्हा राज्यात अग्रेसर ठरला आहे. महिलांच्या उत्पादनांना ऑनलाईन बाजारपेठ मिळावी यासाठी ‘उमेद स्मार्ट वेबपोर्टल’ सुरू करण्यात आले आहे. याद्वारे जिल्ह्यातील ६१ उत्पादने ऑनलाईन विक्रीस उपलब्ध असल्याचेही ते म्हणाले. सन २०२४-२५ या वर्षात ७३ हजार ९०९ महिला लखपती दीदी झाल्या असून येणाऱ्या काळात देखील अधिकाधिक महिलांना अभियान व बँकांच्या कर्ज मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देऊन लखपती दीदी बनवण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रदर्शनाला अहिल्यानगरकरांनी मोठ्या संख्येने भेट देऊन ग्रामीण महिला उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात विविध बचतगटांना कर्ज, बँकींग सर्व्हीस मशीन तसेच महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांना बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत मान्यता प्रमाणपत्राचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच लखपती दीदीअंतर्गत महिलांचा सन्मानही करण्यात आला.
पालकमंत्र्यांकडून स्टॉलची पाहणी
विभागीय साईज्योती सरस २०२५ प्रदर्शनात विभागातील पाचही जिल्ह्यातून आलेल्या बचतगटांच्या स्टॉलांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट देऊन उत्पादित केलेल्या मालाची पाहणी करण्यासोबत महिलांशी संवादही साधला. यावेळी पालकमंत्र्यांनी विविध वस्तूंची खरेदीही केली.
२० मार्चपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार
नाशिक विभागातील अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील एकूण ३२५ बचतगट या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. प्रदर्शनामध्ये वस्तू विभाग दालनामधे विविध वस्तूंचे १२० स्टॉल उपलब्ध असून यातून २४० बचत गटांची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच खाद्य विभागाच्या दालनामध्ये ८५ बचतगटांनी तयार केलेल्या चविष्ट अशा शुद्ध शाकाहारी खाद्य पदार्थांचे स्टॉल उपलब्ध आहेत. पाचही दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी असणार असून २० मार्चपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.