इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लहान मुलांवर लादण्याचा सरकारचा प्रयत्न होता, तो प्रयत्न मराठी माणसाच्या एकजुटीने हाणून पाडला. २९ जून २०२५ ला सरकारने हा निर्णय मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर आता ठाकरे बंधु विजयी मेळावा घेणार असून त्याचे ठिकाणही आता ठरले आहे. हा मेळावा ५ जुलै रोजी मुंबईत वरळी डोम सभागृहात साजरा होणार आहे. या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित रोहणार आहे. या मेळाव्याची जोरदार आणि जय्यत तयारी सुरु झाली आहे.
आता या मेळाव्याचे राज व उध्दव ठाकरे यांनी पहिल्यांदा एकत्र आवाहन केले आहे. आवाज मराठीचा ! मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं…! कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं! आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या !! आम्ही वाट बघतोय…! आपले नम्र राज ठाकरे – उद्धव ठाकरे
खाली या आवाहन पोस्टमध्ये ठिकाण व वेळ टाकली आहे. त्यात ५ जुलै २०२५, एन. एस. सी. आय. डोम, वरळी सकाळी १० वाजता असे म्हटले आहे.
