इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तामिळनाडूतील रामेश्वरम येथे ८३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांची पायाभरणी केली, तसेच ते राष्ट्राला समर्पित केले. त्याआधी त्यांनी नवीन पंबन या रेल्वे पूलाचे उद्घाटन केले. हा भारतातील पहिला उभा उघडता येणारा सागरी पूल (vertical lift sea bridge) आहे. यावेळी पंतप्रधानांनी रस्ता पुलावरून एक रेल्वे गाडी आणि एका जहाजालाही हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी त्यांनी या सागरी पुलाच्या कार्यान्वयाचीही पाहणी केली. त्यांनी रामेश्वरम इथल्या रामनाथस्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजाही केली.
रामेश्वरम ही भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जन्मभूमी असून, त्यांच्या आयुष्यातून विज्ञान आणि अध्यात्म एकमेकांना कशारितीने पूरक ठरतात हे दाखवून दिले असल्याचे पंतप्रधान म्हणाले. रामेश्वरमकडे जाणारा हा नवीन पंबन पूल तंत्रज्ञान आणि परंपरेच्या संगमाचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. हजारो वर्षांपूर्वीचे हे एक प्राचीन शहर आता २१ व्या शतकातील अभियांत्रिकी चमत्कार असलेल्या पूलाद्वारे जोडले गेले असल्याची बाब त्यांनी अधोरेखीत केली. यावेळी पंतप्रधानांनी अभियंते आणि कामगारांच्या समर्पणाबद्दल आणि त्यांच्या कष्टाबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. हा भारतातील पहिला उभा उघडता येणारा सागरी पूल (vertical lift sea bridge) , असून या पुलाखालून मोठी जहाजे सहतेने जाऊ शकतात, यामुळे जलदगतीने रेल्वे प्रवासही शक्य झाला असल्याची बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली. रविवारी सकाळीच आपण एका नवीन रेल्वे गाडीला आणि जहाजाला ध्वज दाखवून रवाना केल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले, आणि या अद्भूत प्रकल्पासाठी तामिळनाडूतील जनतेचे पुन्हा एकदा अभिनंदन केले.
या पुलासाठीची मागणी गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित होती, जनतेच्या आशीर्वादामुळे आपल्याला हे काम पूर्णत्वाला नेण्याचा सन्मान मिळाला ही बाबही त्यांनी अधोरेखीत केली. या पुलामुळे व्यवसाय सुलभता आणि प्रवास सुलभता या दोन्हींना पाठबळ मिळणार आहे, त्याचा लाखो लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडणार आहे असे पंतप्रधान म्हणाले. नवीन रेल्वे सेवेमुळे रामेश्वरमची चेन्नईसोबतची आणि देशाच्या इतर भागांसोबतची दळणवळणीय जोडणी वाढेल, यामुळे तामिळनाडूमधील व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळेल तसेच इथल्या युवा वर्गासाठीही रोजगार आणि व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण होतील ही बाबही पंतप्रधानांनी अधोरेखित केली.