इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळवणे सोपी गोष्ट नाही. त्यासाठी प्रचंड अभ्यास, मेहनत आणि कष्ट करावे लागतात. ज्यांच्याकडे सर्व सोयीसुविधा आणि उपलब्ध आहेत. अशा कुटुंबातील मुलांना या परीक्षांमध्ये यश मिळवणे सहज शक्य असते. परंतु एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातील मुला-मुलींनी अडथळ्यांवर मात यश मिळवले. तर ते निश्चितच प्रेरणादायी म्हणावे लागेल. मध्य प्रदेशात भाजी विक्रेत्याच्या मुलीने अतिशय कौतुकास्पद यश मिळविले आहे. ती दिवाणी न्यायाधीश झाली आहे. त्यामुळेच सध्या देशभरात तिची जोरदार चर्चा होत आहे.
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये भाजी विक्रेत्याच्या मुलीने सर्व अडथळे आणि अडचणींवर मात करत यशाची शिखरे सर केली. अंकिता नागर (वय 29) ही चौथ्या प्रयत्नात भरती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दिवाणी न्यायाधीश बनली. या परीक्षेत तिने पाचवा क्रमांक पटकावला आहे. याबाबत अंकिता म्हणाली, माझा आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. तिचे वडील अशोक नगर शहरातील मुसाखेडी भागात भाजीविक्रेते आहेत. परीक्षेच्या तयारीतही तिच्या वडिलांनी तिला मोकळा वेळ दिला.
अंकिताने सांगितले की, ती तिच्या तीन प्रयत्नांत परीक्षा उत्तीर्ण होऊ शकली नाही पण न्यायाधीश होण्याचे तिचे स्वप्न तिने कधीही सोडले नाही. चौथ्या प्रयत्नात तिने दिवाणी न्यायाधीश वर्ग-२ ची परीक्षा उत्तीर्ण करण्यात यश मिळवले. एलएलबी आणि एलएलएम केलेल्या अंकिताने कायद्याची पदवी घेत असतानाच न्यायाधीश होण्याचा निर्णय घेतला होता.
तिने सांगितले की, तीन अयशस्वी प्रयत्न करूनही तिने आपला आत्मविश्वास गमावला नाही आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले. ती म्हणाली की, दिवाणी न्यायाधीश या नात्याने न्यायालयात येणाऱ्या प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यावर तिचा भर असेल. तिला आधी डॉक्टर व्हायचे होते पण वैद्यकिय अभ्यासाचा खर्च खूप आहे. त्यामुळे दिवाणी न्यायाधीश परीक्षेची तयारी सुरू केली. तिने त्यांचा बहुतांश अभ्यास सरकारी शिष्यवृत्तीवर केला आहे. अंकिताने दिवाणी न्यायाधीशांच्या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी पैसे कमी असल्याचे सांगितले, तेव्हा आई म्हणाली संध्याकाळपर्यंत थांबा, भाजी विकून पैसे येतील.
अंकिताच्या मते, आज ती या टप्प्यावर आहे कारण हे तिच्या आई-वडिलांच्या मेहनतीचे फळ आहे. मात्र, कोचिंग इन्स्टिट्यूटचे मित्र आणि शिक्षकांची मदत ती विसरली नाही. सर्वांच्या मेहनतीमुळेच तिला हे यश मिळवता आले आहे, असा विश्वास तिने व्यक्त केला.
दरम्यान, तिचे वडील अशोक नागर सांगतात की, आयुष्यात अडचणी आल्या तरी हिंमत हारता कामा नये. याचा आदर्श त्यांच्या मुलीने घालून दिला आहे. मुलगी आणि मुलगा असा भेद न करता शिक्षण पूर्ण केले पाहिजे, असेही ते म्हणाले. तिच्या शिक्षणासाठी आम्ही खूप तडजोडी केल्या.